क्रिकेटविश्वात सध्या १९ वर्षाखालील मुलांचा वनडे विश्वचषक २०२६ सुरू आहे. याच्या उपांत्य फेरीतील सामने सुरू आहेत. तसेच काही दिवसांतच पुरूष वरिष्ठ संघांचा टी२० विश्वचषक २०२६ सुरू होणार आहे. ही स्पर्धा येत्या ७ फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे. टी२० क्रिकेट म्हटले की चौकार-षटकांराचा पाऊस करत गोलंदाजांची जाम धुलाई, मात्र काही क्रिकेटपटू असे आहेत ज्यांना भोपळाही फोडता आला नाही. काहींनी तर टी२० विश्वचषकात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचे विक्रम केले आहेत.
या विक्रमामध्ये सर्वात अव्वल स्थानावर पाकिस्तानचा माजी स्टार अष्टपैलू शाहीद आफ्रिदी आहे. त्याने टी२० विश्वचषकात ३२ डाव खेळले असून त्यातील ५ डावांमध्ये तो शून्यावर तंबूत परतला आहे. दुसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा माजी सलामीवीर तिलकरत्ने दिलशान आहे. त्याने टी२० विश्वचषकात ३४ डावांमध्ये फलंदाजी करताना ५ वेळा त्याला एकही धाव करता आली नाही .
तिसऱ्या क्रमांकावर एक नाहीतर १० खेळाडू आहेत, जे प्रत्येकी चारदा शून्यावर वरच विकेट गमावून बसले. यामध्ये श्रीलंकेचा सनथ जयसूर्या, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू आंद्रे रसेल- सिमन्स, अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी यांच्यासह आणखी सहा खेळाडूंंचा समावेश आहे. या यादीत भारताच्या एका खेळाडूचाही समावेश आहे.
भारताचा आशिष नेहरा तीनवेळा टी२० विश्वचषक स्पर्धेत शून्यावर बाद झाला आहे. त्याने या स्पर्धेतील १० सामने खेळले असून त्यातील तीन डावांमध्ये तो फलंदाजीला आला होता. त्या तिन्ही डावांमध्ये तो शून्य धावावरच परतला. यामध्ये क्विंटन डी कॉक, शाकिब अल हसन, पथुम निसांका यांचाही समावेश आहे. हे सर्वही ३-३ वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
यंदाच्या टी२० विश्वचषकातही कोण आणि कितीवेळा शून्यावर बाद होईल, याकडे लक्ष असेल. तसेच प्रथमच भारताचा रोहित शर्मा आणि बांग्लादेशचा शाकिब यांच्याशिवाय ही स्पर्धा खेळली जाणार आहे. हे दोघेही २००७ ते २०२४ दरम्यान झालेल्या सर्व टी२० विश्वचषकात खेळले आहेत.






