7 फेब्रुवारीपासून टी-20 (ICC T20 international world cup 2026) विश्वचषकाचा थरार सुरू झाला असून दररोज अटीतटीचे सामने पाहायला मिळत आहेत. यावेळी पहिल्यांदाच 20 संघ सहभागी झाले असून, विजेतेपदासाठी अनेक संघांमध्ये चुरस आहे. अशातच टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Saurav Ganguly) यावेळचा चषक कोण उंचावणार, याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
गांगुलीच्या मते, सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघ यावर्षी विश्वचषक जिंकू शकतो. गांगुली म्हणाले, हा संघ अत्यंत बलाढ्य आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर संघात उत्तम संतुलन आहे. जसजसा हा विश्वचषक पुढे जाईल, तसतसा भारतीय संघ अधिकच धोकादायक ठरेल. 2026 चा विश्वचषक जिंकण्यासाठी टीम इंडिया ‘फेव्हरेट’ आहे. यावेळी त्यांनी कर्णधार सूर्याचेही कौतुक करत त्याला ‘चॅम्पियन टी-20 प्लेयर’ म्हटले.
जर भारताने यावेळी विजेतेपद राखले (Defend), तर सलग दोनवेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातील पहिलाच संघ ठरेल. आतापर्यंत कोणत्याही देशाला सलग दोनदा हे जेतेपद मिळवता आलेले नाही. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला. या सामन्यात एका टप्प्यावर भारतीय फलंदाजी गडगडली होती, पण कर्णधार सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत 84 धावांची तुफानी खेळी करत संघाला सावरले. 2026 सालातील सूर्याचे हे चौथे अर्धशतक ठरले आहे. भारताचा पुढचा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नामीबियाविरुद्ध होणार आहे.






