दिल्ली-NCR मधील भटक्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होममध्ये पाठवण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची पत्नी रितिका सजदेह हिने या निर्णयाविरोधात स्पष्ट मत व्यक्त केले आहे. तिचे म्हणणे आहे की, भटक्या कुत्र्यांना अशा प्रकारे बंदिस्त करणे हा समस्येचा उपाय नाही.
रितिकाने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, भटके कुत्रे फक्त रस्त्यावर फिरणारे प्राणी नसून शहराच्या धडकीचे प्रतीक आहेत. हेच ते आहेत जे चहाच्या टपऱ्यांवर बिस्किटांची वाट पाहतात, दुकानदारांसाठी रात्री पहारेदारी करतात, मुलं शाळेतून परतली की आनंदाने शेपूट हलवतात आणि आपल्या अस्तित्वामुळे परिसरात मायेचा स्पर्श देतात.
तिच्या मते, त्यांना अचानक शेल्टरमध्ये बंद करणं म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्य आणि जीवनाची ओळख हिरावून घेण्यासारखं आहे. या समस्येवर तीने उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात नसबंदी, वेळोवेळी लसीकरण, प्रत्येक भागात फीडिंग झोन तयार करणे आणि लोकांना दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहित करणे असे अभियान सुचवले.
रितिकाने इशाराही दिला की, “एक समाज जो आपल्या बेजुबान प्राण्यांचे रक्षण करू शकत नाही, तो हळूहळू आपली माणुसकी गमावतो. आज हे कुत्रे आहेत, उद्या कोण?”
सुप्रीम कोर्टाच्या जस्टिस JB पारदीवाला आणि जस्टिस R महादेवन यांच्या खंडपीठाने अलीकडे आदेश दिला की दिल्ली-NCR मधून भटक्या कुत्र्यांना पूर्णपणे हटवले जावे. पकडलेल्या कुत्र्यांना पुन्हा रस्त्यावर सोडले जाणार नाही, आणि प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर अवमानाचा गुन्हा दाखल केला जाईल.
एका बाजूला कोर्टाच्या निर्णयाला नागरिक सुरक्षेसाठी आवश्यक मानणारे लोक आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्राणीप्रेमी आणि कार्यकर्ते हा निर्णय क्रूर व अव्यवहार्य असल्याचे सांगत आहेत. रितिकाचे विधान या चर्चेला सोशल मीडियावर आणखी उग्र करू शकते.






