गेल्या कित्येक दिवसांपासून सर्वजण डोळ्यात तेल घालून वाट पाहत असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेची गुरुवारपासून (१७ डिसेंबर) सुरुवात झाली. ऍडलेड येथे सुरू असलेल्या दिवस-रात्र सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्र्रेलियन गोलंदाजांनी भारतीय संघावरील दबाव राखून ठेवला. त्यामुळे पहिल्या दिवसाखेर भारतीय संघाची धावसंख्या ६ बाद २३३ धावा इतकी झाली. अशात पहिल्या कसोटी सामन्यात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंना काही गोष्टी कराव्या लागणार आहेत.
ऍडलेडमध्ये ३०० धावा करणे गरजेचे
भारत-ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाअखेर भारताने धावफलकावर २३३ धावांचा आकडा नोंदवला आहे. अशात सामन्यात टिकून राहण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत ३०० धावांचा आकडा गाठावा लागणार आहे. यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा आणि फिरकीपटू आर अश्विन फलंदाजी करत आहेत. त्यामुळे संघाचा पहिला डाव ३०० धावांपर्यंत नेण्यासाठी साहाला जिवाचे रान करुन खेळावे लागणार आहे.
साहा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सराव सामन्यात त्याने अर्धशतकही केले होते. अशात साहाला रिषभ पंतऐवजी आपली निवड करुन कर्णधार विराट कोहलीने योग्य निर्णय घेतला असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. तसेच, अश्विनला मैदानावर टिकून राहून साहाची साथ द्यावी लागणार आहे.
वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची
जर भारतीय संघाने पहिल्या डावात ३०० पेक्षा जास्त धावा केल्या, तर भारताच्या वेगवान गोलंदाजांना ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दबाव निर्माण करण्याची संधी असेल. ऍडलेडच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी संधीचे सोने करण्याची आवश्यकता आहे.
आर अश्विनची भूमिका खूप महत्त्वाची
भारतीय कसोटी संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सध्या आर अश्विन हा एकमेव फिरकीपटू उपलब्ध आहे. त्यामुळे त्याला आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी लागणार आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाचा फिरकीपटू नॅथन लायनला चांगला टर्न आणि बाऊन्स मिळाला. परिणामत: त्याने चेतेश्वर पुजाराची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. त्यामुळे अश्विनला आपला जलवा दाखवण्याची संधी आहे.
भारतीय संघाला करावे लागणार दमदार क्षेत्ररक्षण
ऍडलेड येथील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पुनरागमन करण्यासाठी भारतीय संघाला चांगले क्षेत्ररक्षण करावे लागणार आहे. यापूर्वी झालेल्या वनडे आणि टी२० मालिकेत भारताचे क्षेत्ररक्षण अधिक चांगले राहिलेले नाही. त्यामुळे कसोटी सामन्यातील आपली पकड मजबूत बनवण्यासाठी फलंदाजी, गोलंदाजीसह दमदार क्षेत्ररक्षण करणेही गरजेचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार असावा तर असा! अंगठ्यातून रक्त येत असतानाही दाखवली विराटने ‘हिम्मत’
…अन विराट बाद असूनही राहिला नाबाद; वाचा काय आहे प्रकरण
‘…म्हणून विराटच्या पालकत्त्व रजेच्या विषयावर अधिक चर्चा नको’, गांगुलीचे मोठे वक्तव्य