इंग्लंड आणि भारत यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत अखेरचा सामना रविवारी (१७ जुलै) खेळला जाणार आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हा सामना होईल. दोन्ही संघांनी एकेक सामना जिंकल्याने या सामन्याला अंतिम फेरीचे स्वरूप आले आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची रणनीती कशी असेल, यावर अनेकांचे लक्ष आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दहा गडी राखून मोठा विजय मिळवलेला. मात्र, लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने त्या पराभवाची सव्याज परतफेड करत भारतीय संघाला १०० धावांनी पराभूत केले. त्यामुळे अखेरचा सामना जिंकून मालिका आपल्या नावे करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करताना दिसतील. वनडे मालिकेआधी झालेली टी२० मालिका भारताने २-१ अशी जिंकलेली.
भारतीय संघाबाबत बोलायचे झाल्यास कर्णधार रोहित शर्मा संघाच्या अंतिम अकरामध्ये बदल करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्याने दुसऱ्या सामन्यानंतर फक्त खेळाडूंनी आपल्या खेळात बदल केला पाहिजे असे म्हटलेले. पहिल्या सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावल्यानंतर रोहित दुसऱ्या सामन्यात खातेही खोलू शकला नव्हता. तर शिखर धवन दोन्ही सामन्यात कमालीचा संथ खेळला आहे. विराट कोहली त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममधून जातोय. तर रिषभ पंत व हार्दिक पंड्या यांनी दुसऱ्या सामन्यात बेजबाबदार फटके मारून आपली विकेट गमावली होती. केवळ सूर्यकुमार यादव हाच आत्मविश्वासाने इंग्लिश गोलंदाजांना सामोरा गेलेला.
गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत. परंतु तिसरा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा काहीसा महागडा ठरला. रवींद्र जडेजा हा देखील गोलंदाजीत आपले तितकेसे योगदान देऊ शकला नाही. लेगस्पिनर युजवेंद्र चहल याचा फॉर्म हा भारतासाठी आनंदाची गोष्ट आहे.
मँचेस्टरच्या मैदानावर नजीकच्या काळातील भारताचा इतिहास काहीसा खराब दिसतो. इंग्लंडने या मैदानावर भारताला तिन्ही वेळेस पराभूत केले आहे. तसेच, २०१९ एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताला याच मैदानावर न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागलेली.
महत्त्वाच्या बातम्या-
खराब फॉर्मातील विराट करू लागला ‘राम’ नामाचा जप, अनुष्कासोबतचा फोटो व्हायरल
सचिनचा रेकॉर्ड आता मोहम्मद शमी तोडणार, कर्णधार रोहितकडेही विक्रम रचण्याची संधी