टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात भारतीय टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात भारताच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली आणि संघाने 200 धावांचा टप्पा पार केला. आपल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप फायनलमधील सर्वोच्च धावसंख्येचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि ईशान किशन या तिघांनीही 50 पेक्षा जास्त धावा केल्या. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतके ठोकण्याचा पराक्रम केला आहे. संजू सॅमसनने 46 चेंडूत 89 धावा, ईशान किशनने 25 चेंडूत 54 धावा, अभिषेक शर्माने 21 चेंडूत 52 धावा केल्या.
टीम इंडियाने 15 व्या षटकामध्येच 200 धावांचा टप्पा ओलांडला होता. टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये 200 पेक्षा जास्त धावा करणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्सच्या मोबदल्यात 255 धावा केल्या.
टी-20 वर्ल्ड कपच्या संपूर्ण इतिहासातील ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. भारतीय संघाने पुरुष टी-20 क्रिकेटमध्ये सातव्यांदा 250 धावांचा आकडा पार केला आहे.
वरच्या फळीतील फलंदाजांशिवाय लोअर ऑर्डरमध्ये शिवम दुबे (Shivam Dube & Hardik pandya) आणि हार्दिक पांड्या यांनीही मोलाचे योगदान दिले. हार्दिकने 13 चेंडूत 18 धावा केल्या, तर शिवम दुबेने अवघ्या 8 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 26 धावांची तुफानी खेळी केली. आता न्यूझीलंडचा संघ 256 धावांचे हे मोठं आव्हान पेलू शकतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






