भारतीय संघाचा टी20 कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) सुरुवात फारशी चांगली राहिली नव्हती. त्याने आयर्लंड दौऱ्यापासून नेतृत्वं हातात घेतलं होतं, जिथे टीम इंडियाला 2-0 ने पराभवाचा सामना करावा लागला होता.
यानंतर इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतही भारतीय संघ 4-0 ने पराभूत झाला होता. सतत दोन मालिका गमावल्यानंतर, आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिम्बाब्वे दौऱ्यावर आपली पहिली मालिका जिंकली आहे. या दौऱ्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने जिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून मालिकेत 2-0 ची आघाडी घेतली आहे.
सामना जिंकल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये बोलताना श्रेयस अय्यरने आपला आनंद व्यक्त केला आणि म्हणाला की, संघाने ज्या प्रकारे हा शानदार विजय मिळवला आहे, त्याने खूप आनंद झाला आहे. तो म्हणाला की, हा संपूर्ण संघाचा एकत्रित आणि उत्कृष्ट खेळ होता.
फलंदाजीचे कौतुक करताना त्याने सांगितले की, इशान किशन (Ishan Kishan and Tilak verma) आणि तिलक वर्मा यांनी खरोखरच अप्रतिम फलंदाजी केली आणि त्यांचे काही शॉट्स अत्यंत सुंदर होते. सुरुवातीला 180 ते 200 धावांचा स्कोर चांगला वाटत होता, पण संघाने 220 धावा केल्या, जो एक उत्तम आकडा ठरला. यानंतर गोलंदाजांनीही योग्य लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करत समोरच्या संघाला जवळपास 130 धावांवरच ऑलआउट केले.
युवा खेळाडूंच्या निडर आणि धाडसी शैलीबद्दल अय्यर म्हणाला की, खेळ नेहमी याच मानसिकतेने खेळला पाहिजे. जुन्या गोष्टी विसरून वर्तमानात जगणे आणि प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घेणे आवश्यक आहे. संघात प्रत्येकाला पुढे जाण्याची आणि शिकत राहण्याची प्रेरणा दिली जात आहे. पुढील सामन्यातील बदलांबद्दल विचारल्यावर, त्याने सांगितले की अजून याविषयी प्रशिक्षकांशी चर्चा झालेली नाही, पण प्रिंस यादव दुखापतग्रस्त झाल्यामुळे पुढील टी-20 सामन्यात एक-दोन बदल पाहायला मिळू शकतात.
दुसऱ्या टी-20 सामन्यात गोलंदाजी करत असताना प्रिंस यादवला हॅमस्ट्रिंगचा (स्नायूंच्या ताणाचा) त्रास जाणवला. त्यामुळे त्याला आपल्या स्पेलच्या दुसऱ्या ओव्हरमध्येच मैदान सोडावे लागले. या सामन्यात प्रिंसने 1.2 षटकांत 10 धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. तसेच, पदार्पण करणारा यश ठाकुर यानेही 4 षटकांत 30 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. भारताकडून अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 2.5 षटकांत फक्त 17 धावा देऊन सर्वाधिक 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.






