आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व करणारा ३० वर्षीय फलंदाज सूर्यकुमार यादव याला इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. परंतु त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर पुन्हा त्याला चौथ्या टी-२० सामन्यात संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्याने संघासाठी महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली आणि सामनावीरही ठरला. ही खेळी खेळण्यापूर्वी त्याला काय सांगण्यात आले होते? याचा खुलासा त्याने सामना झाल्यानंतर केला आहे.
चौथा टी -२० सामना मालिकेच्या आणि भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना होता. या सामन्यात इशान किशन दुखापतीमुळे बाहेर होता. त्याऐवजी सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली होती. पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून यजमानांना फलंदाजीसाठी आमंत्रण दिले होते. संघातील मुख्य खेळाडू गारद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंतने सामना पुढे नेला. सूर्यकुमार यादव ५७ धावांची खेळी करत वादग्रस्त निर्णयावर झेल बाद झाला.
सकाळीच सांगण्यात आली होती ही गोष्ट
सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर झालेल्या वर्चुअल पत्रकार परिषदेत म्हटले की, “मला असे वाटते की मी गेल्या तीन-चार वर्षांत सर्व क्रमांकावर फलंदाजी केली आहे. सातव्या आणि आठव्या क्रमांकावरही मला फलंदाजीचा अनुभव आहे. मी कोणत्याही ठिकाणी फलंदाजी करण्यास लवचिक आहे. जेव्हा जेव्हा कोणीही मला विचारतं तेव्हा मी असेच बोलतो. मी संघ व्यवस्थापनाला असेच म्हटले आहे की, कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मी लवचिक आहे. त्यांना माझ्याकडून जिथेही फलंदाजी करवून घ्यायची असेल मी करेल. त्यामुळे मला संधी मिळाली याचा मला आनंद आहे.”
“संघ व्यवस्थापकांनी मला सकाळीच सूचित केले होते की, मला वरच्या क्रमात फलंदाजी करायची आहे ते ही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागणार आहे. त्यामुळे मला सरावासाठी वेळ देण्यात आला होता. मी म्हटले मी पूर्ण प्रयत्न करेल आणि संधीचा लाभ घेईल,” असे पुढे सूर्यकुमार यादवने सांगितले.
वनडे संघात मिळाली जागा
सूर्यकुमार यादवला संघात समाविष्ट करण्याच्या मागणीने यापूर्वी देखील जोर धरला होता. यादवने आयपीएल स्पर्धेत फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये देखील उल्लेनिय कामगिरी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने मुंबई संघासाठी महत्वाच्या खेळी केल्या. त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते.
या संधीचे सोने करत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिल्याच डावात अर्धशतक झळकावले आहे. तसेच त्याला इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी देखील संघात स्थान देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इशान किशनला का मिळाली नाही चौथ्या टी२०त संधी? कॅप्टन कोहलीने सांगितले कारण
कर्नाटकच्या युवा गोलंदाजाचं चमकलं नशीब, इंग्लंडविरुद्ध वनडे पदार्णासाठी सज्ज; ‘अशी’ राहिली कमागिरी
ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणारा भारतीय खेळाडू परतला, पाचव्या टी२० सामन्यात मिळणार संधी?