पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु असून या सामन्याचा आज (16 डिसेंबर) तिसरा दिवस आहे. आज भारताचा पहिला डाव 283 धावांवर संपुष्टात आला आहे.
या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने 257 चेंडूत 123 धावा केल्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. विराटने 214 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले असून हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील 25 वे शतक आहे.
विराटने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना आज कसोटीतील 5000 धावांचा आकडा पार केला आहे. यासाठी त्याने 86 डाव घेतले.
कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना 5000 धावा पूर्ण करणारा विराट जगातील दहावा तर भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी सचिन तेंडुलकर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांनी ही कामगिरी केली आहे.
तसेच विराटने कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना सर्वात जलद 5000 धावांचा टप्पा पार केला. हा विक्रम करताना त्याने जॅक कॅलिस, तेंडुलकर, जावेद मियाॅंदाद आणि ब्रायन लारा यांना पिछाडीवर टाकले आहे.
विराटने 53 सामन्यांच्या 86 डावात या 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. तर कॅलिसने 87 डावात, तेंडुलकरने 93, मियाॅंदादने 99 आणि लाराने 100 डावांमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या:
–तब्बल २६ वर्षांनंतर पर्थमध्ये अशी कामगिरी करणारा विराट कोहली बनला केवळ चौथा भारतीय
–दक्षिण आफ्रिका, इंग्लंड नंतर ऑस्ट्रेलियातही विराट कोहलीचा शतकाचा धडाका सुरूच