भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील एकदिवसीय मालिकाचा शेवटचा सामना शुक्रवारी (११ फेब्रुवारी) खेळला गेला. एकदिवसीय मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली गेली. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने ९६ धावांनी मोठा विजय मिळवला. वेस्ट इंडीजला मालिकेतील एकही सामना जिंकता आला नाही आणि भारताने ३-० च्या फरकाने मालिका नावावर केली. उभय संघातील या मालिकेत एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जास्त झेल घेतले गेले.
वेस्ट इंडीजविरुद्धची ही एकदिवसीय मालिका भारतीय संघासाठी खरोखर एक ऐतिहासिक मालिका ठरली आहे. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये मिळून एकूण ४२ खेळाडू झेलबाद झाले. हा आकडा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठा आहे. या मालिकेव्यतिरिक्त इतर एकाही एकदिवसीय मालिकेत आतापर्यंत ४२ झेल घेतले गेले नव्हते. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात १९९५ मध्ये खेळली गेलेली एकदिवसीय मालिका आहे. जिम्बाब्वे आणि पाकिस्तानमधील या एकदिवसीय मालिकेत एकूण ३९ झेल घेतले गेले होते. यादीत तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडीज आणि आयर्लंड यांच्यात याच वर्षी खेळली गेलेली एकदिवसीय मालिका आहे. ज्यामध्ये एकूण ३८ झेल घेतले गेले.
या यादीत विशेष गोष्ट ही आहे की, वेस्ट इंडीज संघाचे नाव यामध्ये दोन वेळा आहे आहे. या दोन्ही मालिका वेस्ट इंडीजने २०२२ मध्ये लागोपाठ खेळल्या आहेत. त्यामुळे वेस्ट इंडीजसाठी हा विक्रम अधिक महत्वाचा ठरत आहे. या तिन्ही एकदिवसीय मालिका जास्तीत जास्त तीन सामन्यांच्या होत्या.
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील शेवटच्या एकदिवसीय सामन्याचा विचार केला, तर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २६५ धावा केल्या. रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली या वरच्या फळीतील फलंदाजांनी स्वस्तात विकेट गमावल्या होत्या. परंतु नंतर श्रेयस अय्यर (८०) आणि रिषभ पंत (५६) यांच्यात ११० धावांची महत्वाची महत्वाची भागीदारी झाली आणि दोघांनी स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले. त्यांच्या खेळीच्या जोरावर संघ अपेक्षित धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडीज संघ अवघ्या १६९ धावांवर सर्वबाद झाला. वेस्ट इंडीजसाठी एकही खेळाडू अर्धशतकी खेळी करू शकला नाही. परिणामी संघाला मालिकेतील सलग तिसरा पराभव मिळाला. उभय संघात आता १६ फेब्रुवारीपासून कोलकातामध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. टी-२० मालिकेतील सामने १६, १८ आणि २० फेब्रुवारीला खेळले जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –
IPL Auction 2022 | विश्वविजेत्या टीम इंडिया U19 संघातील १० खेळाडू मेगा लिलावात सामील, वाचा नावे
भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी पॉंटिंगने घेतली ‘या’ तिघांची नावे