क्रीडाविश्वाच्या दृष्टीने २०२० हे वर्ष विसरण्यासारखे राहिले आहे. सर्व जागतिक स्पर्धा कोरोना महामारीमुळे रद्द कराव्या लागल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या. चार वर्षातून एकदा होणारी ऑलिंपिक देखील एक वर्ष पुढे केली गेली. मात्र, क्रिकेटसाठी काही सुखदायक गोष्टी घडल्या. कोरोना संक्रमण येण्याआधी महिला टी२० विश्वचषक आणि एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक या प्रमुख स्पर्धा पार पडल्या होत्या. त्यापैकी, एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत जानेवारी महिन्यात आयोजित केला गेलेला. या स्पर्धेत भारत उपविजेता राहिला. मात्र, या विश्वचषकातून नेहमीप्रमाणे भारतीय संघाला काही युवा सितारे मिळाले; ज्यांनी हे सिद्ध केले की, भारतीय क्रिकेट संघाचे भविष्य सामर्थ्यवान खेळाडूंच्या हाती आहे. या स्पर्धेतून जी नावे पुढे आली, त्यातील प्रमुख नाव म्हणजे वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी.
शेतकरी कुटुंबात झाला जन्म
कार्तिकचा जन्म उत्तर प्रदेशमधील हापुड जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावात झाला. त्याचे वडील योगेंद्र अल्पभूधारक शेतकरी आहेत. योगेंद्र यांच्याकडे १५-२० गुंठ्यांची छोटीशी शेती होती. कार्तिक पाच वर्षाचा असेल तेव्हा त्यांच्या घरी पाहुणे आले असता; पाहुण्यांनी त्याला चित्र काढण्यास सांगितले. त्यावेळी छोट्या कार्तिकने क्रिकेट मैदानाचे चित्र काढले. त्याच वेळी खेळाप्रती त्याला असलेली आवड सर्वांना दिसून आली.
ट्रायलसाठी केला उत्तर प्रदेश ते चंदीगड असा प्रवास
कार्तिक १० वर्षाचा होता तेव्हा, एकदा वर्तमानपत्रात १२ वर्षाखालील क्रिकेट संघाच्या निवडीची जाहिरात आली. ही निवड चंदीगडला होती. योगेंद्र आपल्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. तेथे गेल्यानंतर त्यांना समजले की, फक्त आवड असून चालत नाही नाहीतर, क्रिकेट शिकावे देखील लागते. त्या ठिकाणी आलेली तर मुले चांगल्या क्लबमध्ये प्रशिक्षण घेत होती. कार्तिकला क्रिकेट शिकवायचे असा ध्यास योगेंद्र यांनी घेतला होता.
भुवनेश्वर कुमारच्या प्रशिक्षकांकडे घेतले प्रशिक्षण
चंदीगडवरून परत आल्यानंतर, योगेंद्र यांनी चांगल्या प्रशिक्षकाविषयी चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यांना कोणीतरी सांगितले की, मेरठ येथील विपिन वत्स हे चांगले क्रिकेट प्रशिक्षक आहेत. योगेंद्र यांनी सर्व माहिती काढून कार्तिकला मेरठला नेले. वत्स हे भारताचे राष्ट्रीय खेळाडू राहिलेल्या प्रवीण कुमार व भुवनेश्वर कुमार यांचे देखील प्रशिक्षक होते. वत्स यांनी कार्तिकची चाचणी घेऊन, त्याला वेगवान गोलंदाजी शिकवण्यास सुरुवात केली.
दोन महिन्यात खराब झालेली क्रिकेट किट
कार्तिकचे वडील योगेंद्र हे शेतकरी आहेत आणि तितकेसे सुशिक्षित नाहीत. त्यांनी कार्तिकला पहिल्यांदा १० हजार रुपये खर्चून पहिली क्रिकेट किट दिली. त्यांना वाटले ही किट २-३ वर्ष आरामशीर टिकेल. मात्र, ती किट अवघ्या दोन महिन्यात खराब झाली. घरची आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नसल्याने, कार्तिकला दुसऱ्या किटसाठी काही महिने वाट पहावी लागली होती.
कार्तिक भुवनेश्वर कुमार व ब्रेट ली यांना आपला आदर्श मानतो. ब्रेट लीप्रमाणे वेगात गोलंदाजी करणे त्याला पसंत होते. भुवनेश्वरने २०१२ मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय पदार्पण केले; तेव्हा कार्तिकने क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्याचे नक्की केले. आपल्या चमकदार कामगिरीमुळे कार्तिक वेगाने यशाच्या शिड्या चढू लागला. उत्तर प्रदेशच्या १६ वर्षाखालील संघात दमदार कामगिरी केल्यामुळे त्याला उत्तर प्रदेशच्या रणजी संघासाठी बोलविण्यात आले. वयाची १७ व्या वर्ष पूर्ण करण्याआधीच त्याने प्रथमश्रेणी पदार्पण केले.
प्रवीण कुमार आणि सुरेश रैनाचे मोलाचे मार्गदर्शन
आपल्या प्रथमश्रेणी पदार्पणाचा किस्सा सांगताना कार्तिक म्हणतो, “नेटमध्ये माझी गोलंदाजी पाहून रैना भैय्या व प्रवीण भैय्या (प्रवीण कुमार) यांनी मला सामन्यात खेळवण्याचे ठरवले. प्रवीण भैय्या त्या सामन्यात खेळणार नव्हते; मात्र, माझे पदार्पण असल्याने त्यांनी खेळण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण सामन्यादरम्यान मिड-ऑफ व मिड-ऑनला हे दोन्ही अनुभवी खेळाडू उभे राहून मला मार्गदर्शन करत होते. त्यांच्या या कृतीसाठी मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहील.”
पायाची गंभीर दुखापत
दोन वर्षापूर्वी फुटबॉल खेळताना कार्तिकला पायाची गंभीर दुखापत झाली. त्याच्या वडिलांनी आपली जमीन विकून त्याच्यावर उपचार सुरु ठेवले. मात्र, एक वेळ अशी आली की त्यांच्याकडील सर्व पैसे संपले. तेव्हा कार्तिक उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेशी करारबद्ध होता. त्याने पत्रव्यवहार करत त्याला बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुढील उपचारासाठी पाठवण्याची विनंती केली. उत्तर प्रदेश क्रिकेट संघटना व एनसीएने त्याच्यावरील उपचाराची जबाबदारी उचलली. तेव्हापासून तो फुटबॉल खेळत नाही. सामन्याआधी इतर खेळाडू फुटबॉल खेळून वॉर्माप करतात; मात्र, कार्तिक दुसरा खेळ खेळत असतो.
एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाचा प्रमुख खेळाडू
कार्तिक अगदी कमी वयात उत्तर प्रदेशच्या वरिष्ठ संघात खेळत होता. तो २०१८ पासून भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज बनला. युवा आशिया चषक, इंग्लंड दौरा आणि श्रीलंका दौरा या तिन्ही स्पर्धात तो भारतात सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज होता.
आयपीएलमधून झाला करोडपती
डिसेंबर २०१९ मध्ये त्याची दक्षिण आफ्रिकेत नियोजीत, २०२० च्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली. दोन आठवड्यानी झालेल्या आयपीएल लिलावात त्याचे नाव आले. कार्तिकला आपल्या संघात घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात चुरस रंगली. अखेरीस १.३० कोटी रुपयांची बोली लावत; राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले.
एकोणीस वर्षाखालील विश्र्वचषकात मिळाली ओळख
कार्तिकला खरी ओळख मिळाली ती २०२० एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकातून. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेत तो सर्वांच्या नजरेत आला. चांगली उंची, नवा चेंडू स्विंग करण्याची कला व जुन्या चेंडूने धारदार यॉर्कर टाकण्याच्या कौशल्याने त्याने सर्वांना मोहित केले. भारताला अंतिम फेरीत घेऊन जाण्यात कार्तिकचा मोलाचा वाटा होता. कार्तिकने स्पर्धेत सहा सामने खेळत १३.१० च्या सरासरीने अकरा बळी आपल्या नावे केले. रवी बिश्नोईनंतर सर्वाधिक बळी मिळवणारा तो भारतीय गोलंदाज होता.
आयपीएलमधील शानदार कामगिरी
कोरोना महामारीमुळे पुढे ढकलल्या गेलेल्या आयपीएलमध्ये त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. जयदेव उनाडकत, वरून ऍरॉन, अंकित राजपूत यांच्यासारखे अनुभवी गोलंदाज अपयशी ठरत असताना; कार्तिकने जोफ्रा आर्चरला चांगली साथ दिली. कार्तिकने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध पदार्पण करताना आपल्या पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉकला बाद करत स्वप्नवत सुरुवात केली. कार्तिकने संपूर्ण स्पर्धेत १० सामने खेळताना ९ बळी आपल्या नावे केले. यांना नऊ बळींमध्ये डी कॉकव्यतिरिक्त शेन वॉटसन व आंद्रे रसेल या दिग्गजांचा समावेश होता. कार्तिक ज्याला आदर्श मानतो; त्या ब्रेट लीने देखील त्याचे कौतुक केले.
भारतीय संघासोबत जाणार ऑस्ट्रेलियाला
आयपीएलदरम्यानच, आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली. ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या संघासोबत राखीव वेगवान गोलंदाज म्हणून कार्तिकला स्थान मिळाले. कार्तिकसारख्या उंचपुऱ्या, स्विंग आणि बाऊंसरचा चपखल वापर करणाऱ्या वेगवान गोलंदाजाची भारतीय संघाला गरज आहे. अत्यंत संघर्षातून पुढे आलेला कार्तिक लवकरच भारतीय संघाची निळी जर्सी घालून मैदानात उतरेल यात शंका नाही.