क्रिकेटमध्ये प्रामुख्याने तीन कौशल्य वापरले जातात. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यांचा यात समावेश होतो. सध्याच्या आधुनिक क्रिकेटमध्ये, जवळपास सर्वच खेळाडू या तिन्ही प्रकारात, कमी-अधिक प्रमाणात तरबेज असतात. एकंदरीतच आजकालचे क्रिकेटपटू अष्टपैलू झाले आहेत. मात्र, काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. अभावानेच एखादा फलंदाज चांगली गोलंदाजी करत किंवा गोलंदाज एखादी लक्षात राहण्यासारखी खेळी करत. अशाचप्रकारे सन १९९६ मध्ये भारताच्या दोन प्रमुख गोलंदाजांनी नवव्या गड्यासाठी एक ‘मॅचविनिंग’ भागीदारी करत, सर्व क्रिकेटचाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली होती. भारताला हा अविस्मरणीय विजय मिळवून देणारी जोडी होती, वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ व फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेची.
विश्वचषकानंतरचा ‘टायटन कप’
भारतीय उपखंडातच काही महिन्यांपूर्वी संपलेल्या १९९६ क्रिकेट विश्वचषकानंतर भारत, दक्षिण आफ्रिका व विश्वचषकाचा उपविजेता राहिलेल्या ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान ‘टायटन कप’ या तिरंगी मालिकेचे आयोजन भारतात केले गेले होते. ऑस्ट्रेलिया स्पर्धेचा संभाव्य विजेते म्हणून स्पर्धेत सहभागी झाला. दक्षिण आफ्रिकेचा संघ देखील चांगलाच संतुलित होता. यजमान भारतीय संघात अनुभवी खेळाडू होते. मात्र, संघाचे नेतृत्व अवघ्या तेवीस वर्षीय सचिन तेंडुलकरच्या हाती देण्यात आले होते. विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे, मोहम्मद अजहरुद्दिनची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आलेली. स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अनेकांनी दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाला पसंती दिली होती. या दोन्ही तगड्या संघासमोर भारताची डाळ शिजणार नाही असा कयास लावला जात होता.
दक्षिण आफ्रिकेने केली विजयी सुरुवात
यजमान भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात झाली. अपेक्षेप्रमाणे, दक्षिण आफ्रिकेने भारताला ४७ धावांनी मात देत विजयी सुरुवात केली. दुसरा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा झाला. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत, गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. स्पर्धेतील तिसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बेंगलोरमध्ये होणार होता. स्पर्धेतील आपले आव्हान टिकून ठेवण्यासाठी, दोन्ही संघांसमोर ‘करा किंवा मरा’ अशी परिस्थिती निर्माण झालेली. कारण, एक पराभव दोन्ही संघांना स्पर्धेतून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर येऊ शकत होता.
भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाची उडाली दाणादाण
बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर २१ ऑक्टोबर या दिवशी दिवस-रात्र सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज होते. बेंगलोरच्या दमट वातावरणात, ऑस्ट्रेलियन कर्णधार मार्क टेलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी टेलरला हा निर्णय चुकीचा ठरवला. २५ धावांच्या आतच मार्क वॉ व मायकल स्लेटर एकेरी धावसंख्येवर तंबूत परतले. टेलर आणि स्टीव वॉ यांनी ९२ धावांची भागीदारी करत, ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. सुनील जोशीने स्टीव वॉला बाद करत ही जोडी फोडली. टेलर भरवशाच्या मायकेल बेवनला साथीला घेत पुन्हा किल्ला लढवू लागला. टेलरने दमदार शतक ठोकले. वैयक्तिक १०५ धावा काढून तो भारतीय कर्णधार सचिन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर बाद झाला. उर्वरित षटकात भारतीय गोलंदाजांनी नियंत्रित मारा केल्याने, ऑस्ट्रेलियाचा डाव २१५ धावांवर मर्यादित राहिला. व्यंकटेश प्रसादने तीन बळी घेत, भारतीय गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व केले.
पहिल्या डावात भारतीय गोलंदाजानी दिमाखदार कामगिरी केल्यानंतर, भारतीय फलंदाज हा सामना जिंकून देतील असा विश्वास सर्वांना वाटत होता. मात्र, यानंतर जे घडले ते केवळ अविश्वसनीय आणि आश्चर्यचकित करणारे होते.
भारतीय फलंदाज झाले ढेर
भारताचा डाव देखील ऑस्ट्रेलियाच्या डावप्रमाणे सुरुवातीला गडगडला. भारताचा नवा सलामीवीर सुजित सोमसुंदर याला सात धावांवर ग्लेन मॅकग्राने त्रिफळाचीत केले. त्यानंतर, भारताचे प्रमुख फलंदाज राहुल द्रविड, मोहम्मद अजहरुद्दीन आणि सौरव गांगुली अनुक्रमे चार, सहा व एक धावा काढून एकापाठोपाठ बाद झाले. भारताची अवस्था सतरा षटकात चार बाद ४७ इतकी दयनीय झाली होती.
सचिनची एकाकी झुंज
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन कर्णधाराने ज्याप्रमाणे आपल्या संघाचा डाव सांभाळला. त्याचप्रमाणे, भारतीय कर्णधार सचिन तेंडुलकरने देखील भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अष्टपैलू अजय जडेजासोबत पाचव्या गड्यासाठी ७९ धावा जोडल्या. या जोडीने भारताला सामन्यात पुनरागमनाची संधी दिली. सर्व काही ठीक चालले असताना, स्टीव वॉच्या थेट फेकीवर जडेजा धावबाद झाला. यष्टीरक्षक नयन मोंगियादेखील १४ धावांची भर घालून माघारी परतला. या सर्व घडामोडीत, कर्णधार सचिन तेंडुलकर निग्रहाने फलंदाजी करत होता. त्याने सत्तरीच्या पुढे मजल मारली होती. ४२ व्या षटकात डेमियन फ्लेमिंगने सुनील जोशीच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. पुढील षटकात स्टीव वॉने जम बसलेल्या सचिनला वैयक्तिक ८८ धावांवर पायचीत केले आणि सामना जवळपास ऑस्ट्रेलियाच्या पदरात टाकला.
कुंबळे आणि श्रीनाथची झुंजार भागीदारी
सचिन बाद झाला तेव्हा, भारताला विजयासाठी ४७ चेंडूत ५२ धावांची गरज होती. ऑस्ट्रेलिया विजयाची औपचारिकता किती लवकर पूर्ण करणार, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली. मात्र, मैदानावर उभे होते दोन ‘लोकल बॉय’ अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ. हे दोन्ही खेळाडू लहानपणापासून ज्या मैदानावर खेळले, त्या मैदानावर भारताची लाज राखणार होते. दोघांनी सावधगिरीने खेळायला सुरुवात केली. एकेरी-दुहेरी धावा काढत ते धावफलक पुढे सरकवू लागले. श्रीनाथचा संयम लवकर सुटताना दिसला. तो बॅट फिरवत आणि वारंवार चकत. दुसरीकडे, कुंबळे मात्र अत्यंत शांतचित्ताने खेळत होता. त्याने श्रीनाथला सांभाळून खेळण्याचा सल्ला दिला. कर्नाटकचे हे दोन्ही खेळाडू, भारतीय ड्रेसिंगरूम व भारतीय चाहत्यांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करत होते.
श्रीनाथने बरेचसे चेंडू चकल्यानंतर, पुढे सरसावत मिड-ऑनला दोन चौकार लगावले. कुंबळेने आपला नैसर्गिक खेळ न सोडता, एकेरी दुहेरी धावांवरच भर दिला. फ्लेमिंगच्या खराब चेंडूवर, कुंबळेने चौकार मारत रनरेट भारताच्या आवाक्यात आणला. हळूहळू का होईना पण भारतीय संघ सामन्यात पुनरागमन करत होता.
भारतीय प्रेक्षकांनी देखील आपले श्वास रोखून धरले होते. आज आपल्याला काहीतरी संस्मरणीय पाहायला मिळणार आहे, याची अनुभूती सर्वांना होत होती. याच दरम्यान कॅमेरा सतत दोन महिलांवर केंद्रित होत होता. या दोन महिला अनिल कुंबळेच्या आई व आजी होत्या. निघणार्या प्रत्येक धावेसोबत त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य, प्रेक्षकांत चैतन्य निर्माण करत होते.
भारत लक्ष्याच्या जवळ जाऊ लागला आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार मार्क टेलरने एक चाल खेळली. त्याने ४७ व्या षटकात चेंडू स्टीव वॉच्या हाती सोपविला. वॉ आपल्या मध्यमगती गोलंदाजीने भागीदारी तोडण्यासाठी प्रसिद्ध होता. मात्र, श्रीनाथच्या मनात वेगळेच काहीतरी चालले होते. त्याने पुढे येत, वॉच्या डोक्यावरून सरळ चेंडू प्रेक्षकांत पाठवला. या षटकारामुळे सामना भारताच्या बाजूने झुकला. प्रेक्षक आनंदाने ओरडू लागले. कुंबळे व श्रीनाथने पुढील चेंडू संयमाने खेळत, पळून धावा घेतल्या. जेसन गिलेस्पीने टाकलेल्या ४८ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर अनिल कुंबळेने दोन धावा घेत भारताला थरारक विजय मिळवून दिला.
चिन्नास्वामी स्टेडियमवरील प्रेक्षक वेड्यासारखे नाचत होते, ओरडत होते. कॅमेरामनने शेवटच्या वेळी कुंबळेच्या आई व आजीकडे कॅमेरा फिरवला. त्या दोघी टाळ्या वाजून आपल्या मुलाला शाबासकी देत होत्या. आजही, तो सामना पाहणार्या लाखो प्रेक्षकांना, त्या दोन मातांचे आनंदी चेहरे आठवत असतीलच.
श्रीनाथने २३ चेंडूत नाबाद ३० तर कुंबळेने १९ चेंडूत १६ भावा काढून भारताला हा असामान्य विजय मिळवून दिला होता. सामनावीर म्हणून सचिन तेंडुलकरची निवड झाली. पण, त्या दिवसाचे खरे नायक होते श्रीनाथ आणि कुंबळे. या रोमांचकारी सामन्यानंतर, भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आणि भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत ‘टायटन कप’ उंचावला.
दसऱ्याच्या दिवशी भारतीय संघाने विजयाचे सोने लुटले होते. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताला त्यादिवशी सीमोल्लंघन करून देणारे अनिल कुंबळे व जवागल श्रीनाथ हे ‘त्या’ ऐतिहासिक भागीदारीमुळे भारतीय क्रिकेटरसिकांच्या मनावर राज्य करून गेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाचे-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
अफाट प्रतिभेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्याय न देऊ शकलेले नरेंद्र हिरवानी
भारतात जन्मला असता तर जॅक कॅलिस ‘क्रिकेटचा देव’ असता!!