जगाच्या कानाकोपऱ्यात क्रिकेटप्रेमी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सर्वात जास्त क्रिकेटप्रेमी हे आपल्याला भारतात पाहायला मिळतात. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूला मैदानावर पाहण्यासाठी भारतात नेहमीच प्रेक्षकांची गर्दी असते. भारतीय क्रिकेट संघाचे चाहते हे लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत आहेत. त्याचबरोबर गाव खेड्यापासून ते शहरापर्यंत क्रिकेटप्रेमीचा महासागर आपल्याला दिसतो. मात्र, काही गावातील क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये जाऊन क्रिकेट सामना पाहणे अवघड असते. पण ते एक दिवस आधी शहरात जाऊन त्यांची व्यवस्था करतात आणि सामन्याचा आनंद घेतात.
भारतीय क्रिकेटमध्ये प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या शहरांमध्ये क्रिकेट स्टेडियम आहेत. अशी काही राज्ये आहेत, जिथे तीन किंवा अधिक स्टेडियम आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरातची नावे ही विशेष घेता येतील. अनेक नवीन शहरांमध्ये क्रिकेट स्टेडियमही बांधण्यात आले आहेत आणि त्यामध्ये डेहराडून आणि लखनौची नावे देखील घेता येतील.
परंतु रांची, धरमशाला आणि रायपूरची स्टेडियम देखील नवीन आहेत. असेही काही स्टेडियम आहेत, ज्यांच्या जागी नवीन स्टेडियम बांधण्यात आले आहेत. अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम हे त्याचे उदाहरण आहे. नागपूरचे विदर्भ क्रिकेट स्टेडियमही नवीन करण्यात आले आहे. याशिवाय अशी अनेक स्टेडियम आहेत, जिथे सुधारणा झाली आहे. याचदरम्यान अशी अनेक स्टेडियम आहेत, जिथे वर्षानुवर्षे सामने आयोजित केले गेले नाहीत. खरं तर या स्टेडियमचा सर्वांना जणू विसर पडला आहे.
तब्बल १० ते १५ वर्षे उलटून गेल्यानंतरही तेथे एकही आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन केले नाही. नवीन मैदानांमुळे या मैदानाकडे कोणाचे लक्षही गेले नाही. यापैकी अशाच तीन स्टेडियमबद्दल आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. जिथे दहा वर्षांहून अधिक काळानंतरही सामना आयोजित करण्यात आलेला नाही.
१. ग्वाल्हेर स्टेडियम
हे तेच मैदान आहे, जिथे सचिन तेंडुलकरने जागतिक क्रिकेटचे पहिले द्विशतक झळकावले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा सामना २०१० मध्ये झाला होता. त्यानंतर या स्टेडियमवर एकही आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आलेला नाही. या स्टेडियम ऐवजी आता इंदोरमधील स्टेडियममध्ये सामने आयोजित केले जात आहेत. त्याचबरोबर या भव्य स्टेडियमकडे आता दुर्लक्ष केले जात आहे.
२. कीनन स्टेडियम जमशेदपूर
भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा एकदिवसीय सामना २००६ मध्ये या मैदानावर खेळला गेला होता. म्हणजे तब्बल १६ वर्ष झाले या मैदानावर सामने झाले नाहीत. याच मैदानावर २००६ मध्ये इंग्लंडने भारतीय संघाचा पराभव केला होता. यानंतर आतापर्यंत येथे कोणताही आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आलेला नाही. रांचीतील स्टेडियमच्या बांधकामानंतर या स्टेडियमकडे नेहमी दुर्लक्ष करण्यात आले आहे. अनेक क्रीडाप्रेमींना शेवटचा सामना इथे कधी झाला हे देखील आठवत नाही.
३. बरकतुल्ला खान स्टेडियम, जोधपूर स्टेडियम
बरकतुल्ला खान या स्टेडियममध्ये सामने होऊन २० वर्षे झाली आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील शेवटचा एकदिवसीय सामना येथे २००२ मध्ये खेळण्यात आला होता. भारतीय संघाने त्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. जोधपूरमधील या स्टेडियमचे महत्त्व जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमच्या महत्त्वामुळे समजले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टेडियम असूनही या स्टेडियमकडे कोणाचेही लक्ष गेले नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! बुमराहच्या ‘पाठी’ पुन्हा दुखापतीचा वेताळ! आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का
CWG 2022: अचंता शरथची टेबल टेनिसमध्ये भन्नाट कामगिरी! भारताला जिंकून दिले २२वे सुवर्ण
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी साधली सुवर्ण हॅट्ट्रीक! सात्विक-चिराग जोडीने जिंकले गोल्ड