टी२० विश्वचषकासाठी नुकतीच भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय निवड समितीने हा संघ निवडला. संघाचे नेतृत्व विराट कोहलीच्या हाती देण्यात आले असून, माजी कर्णधार एमएस धोनीला संघाचा मार्गदर्शक बनवण्यात आले आहे. धोनी दुबईत भारतीय संघाला मार्गदर्शन करेल. आयपीएलनंतर तो थेट भारतीय संघात सामील होईल.
निवड समितीने निवडलेल्या १५ सदस्यीय संघात तीन असे खेळाडू आहेत, यांच्या निवडीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनेकांनी त्यांच्याऐवजी दुसर्या खेळाडूंना संधी मिळायला हवी होती, असे म्हटले होते. आज आपण या तीन खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत.
१) अक्षर पटेल-
डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेल एक सरासरी फलंदाज आणि धावा लुटवणारा गोलंदाज म्हणून ओळखला जातो. संघात जडेजा व अश्विन यांच्यासारखे दर्जेदार फिरकीपटू असूनही पटेलला संघात स्थान कसे मिळाले? याबाबत प्रश्नचिन्ह लावले जात आहे. त्याने आयपीएलमध्ये देखील तितकीशी भरीव कामगिरी केली नव्हती. अक्षर पटेलने भारतासाठी १२ टी२० सामने खेळले आहेत ज्यात त्याने ३२.११ च्या सरासरीने केवळ ९ बळी घेतले आहेत.
२) वरूण चक्रवर्ती-
अनुभवी लेगस्पिनर युजवेंद्र चहल व कुलदीप यादव यांना डावलून तमिळनाडूचा मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्ती याला भारतीय संघात स्थान देण्यात आले. त्याने नुकतेच भारतीय संघासाठी टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आयपीएलमध्ये सलग दोन वर्षे केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस म्हणून त्याला ही संधी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
३) रविचंद्रन आश्विन-
कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला अनपेक्षितपणे टी२० विश्वचषकासाठी संधी देण्यात आली. अश्विनने २०१७ पासून आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला नाही. मात्र, भारताचा पहिल्या पसंतीचा ऑफस्पिनर व अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याची दुखापत अश्विनच्या पथ्यावर पडल्याचे सांगितले जात आहे.






