क्रिकेटच्या इतिहासाला आज जवळपास शतको वर्ष लोटली. क्रिकेटमध्ये काळानुसार अनेक बदल होत गेले. तसेच याची लोकप्रियता देखील वाढत गेली. क्रिकेटला नेहमीच अनिश्चिततेचा खेळ म्हणून देखील म्हटले जाते. क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. पुढच्याच चेंडूवर, पुढच्याच षटकात किंवा पुढच्याच सामन्यात काय होईल याचा आधीच अंदाज बांधणे तसे कठीणच.
तसेच सामन्याची परिस्थिती काय असेल, खेळपट्टी कसे असेल, वातावरणात कोणते बदल होऊ शकतात याबाबत आधीच भविष्यवाणी कोणीही करू शकत नाही. सध्या क्रिकेटमध्ये कसोटी, एकदिवसीय, आणि टी-२० या स्वरूपात क्रिकेट खेळली जाते. अशात या तीनही प्रकारच्या स्वरूपात अनेक असे विक्रम प्रस्थापित झाले, जे बनतील याचा कोणी विचार देखील केला नव्हता. आज आपण अशाच ५ विक्रमांबाबत जाणून घेणार आहोत.
१) आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला सर्वात निचांकी धावसंख्येत सर्वबाद केले
क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी संघ म्हणून ऑस्ट्रेलिया संघाकडे पाहिले जाते. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषकावर ५ वेळा आपले नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलियाला प्रत्येक स्पर्धेतील एका विजेत्याच्या रूपाने पाहिले जाते. तर दुसरीकडे बांगलादेशचा वरिष्ठ संघ ज्याने आतापर्यंत क्रिकेट इतिहासात आयसीसीची एकही स्पर्धा जिंकली नाही. तसेच बांगलादेशने तर आशिया चषक देखील जिंकले नाही.
मात्र, नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ टी-२० सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा ४-१ ने धुव्वा उडवला. तसेच क्रिकेट इतिहासात प्रथमच बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एखादी मालिका जिंकली. त्याचसोबत बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक विक्रम देखील प्रस्थापित केला.
बांगलादेशने या मालिकेतील एका सामन्यात ऑस्ट्रेलियाला १३.४ षटकात केवळ ६२ धावांवर सर्वबाद केले होते. ही ऑस्ट्रेलियाच्या टी२० क्रिकेट इतिहासातील आत्तापर्यंतचा सर्वात निचांकी धावसंख्या होती. यासह ऑस्ट्रेलियाला टी२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येत सर्व बाद करणारा संघ म्हणून बांगलादेशने विक्रम प्रस्थापित केला.
२) कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या ४ देशांच्या आधीच केनियाने विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली
जो संघ कसोटी क्रिकेट खेळतो त्याला क्रिकेटच्या अव्वल संघांचा दर्जा दिला जातो. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्यामध्ये आयर्लंड, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि झिम्बाब्वे संघांना विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत देखील पोहोचता आले नाही. हे चारही संघ कसोटी क्रिकेट खेळतात.
मात्र, २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत केनियाने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. तेव्हा तर केनियाचा संघ कसोटी क्रिकेट देखील खेळत नव्हता. तसेच या उपांत्य फेरीत केनियाला भारतीय संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.
३) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने शोएब अख्तर पेक्षाही जास्त चेंडू टाकले आहेत
गॉड ऑफ क्रिकेट म्हणवल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच क्रिकेट इतिहासात ३५,००० धावांचा टप्पा पार करणारा सचिन तेंडुलकर एकमात्र खेळाडू आहे. विशेष म्हणजे सचिनने आपल्या एकदिवसीय क्रिकेटच्या कारकिर्दीत ८,००० पेक्षाही जास्त चेंडू टाकले आहेत.
सचिन भारतीय संघात लेग स्पिनर म्हणून देखील खेळायचा. यामध्ये सचिनने गोलंदाजी करताना चेंडू फेकण्यात पाकिस्तानच्या रावलपिंडी एक्सप्रेस म्हणवल्या जाणाऱ्या शोएब अख्तरला देखील पछाडले आहे. अख्तरने त्याच्या एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीत ७७६४ चेंडू फेकले आहेत.
४) अजित आगरकरने भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक केले आहे
भारतीय संघ नेहमी पासूनच आपल्या फलंदाजांसाठी ओळखला जातो. भारतामध्ये आतापर्यंत अनेक असे मातब्बर फलंदाज होऊन गेले, ज्यांनी क्रिकेटच्या तीनही स्वरूपात अत्यंत उत्कृष्ट फलंदाजी केली होती. मात्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम भारताचा वेगवान गोलंदाज अजित आगरकरच्या नावे आहे.
आगरकरने २००० साली राजकोटमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध केवळ २५ चेंडूंमध्ये ६७ धावांची धडाकेबाज फलंदाजी केली होती. ज्यामध्ये आगरकरने केवळ २१ चेंडूतच आपले अर्धशतक पूर्ण केले होते. जे अजूनही कोणत्याही भारतीय खेळाडूचे सर्वात जलद अर्धशतक आहे. यामध्ये आगरकरने ७ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार लगावले होते.
५) आशिया खंडात सर्वात जलद कसोटी शतक लगावण्याचा विक्रम पाकिस्तानच्या मिसबाह उल हकच्या नावे
एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये ५०-६० चेंडूंमध्ये शतक ठोकणे हे तसे सामान्य वाटते. मात्र, याच्या विरुद्ध कसोटी क्रिकेट हा असा प्रकार आहे, जिथे फलंदाज सावधानीने पूर्ण वेळ देऊन हळूहळू खेळत असतो. मात्र, यातही जर एखाद्या फलंदाजाने ताबडतोड फलंदाजी केली तर त्याची बातच निराळी.
असाच कारनामा पाकिस्तानच्या माजी कर्णधार मिसबाह उल-हकच्या नावे आहे. मिसबाहने २०१४ साली अबुधाबीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५६ चेंडूमध्ये शतक लगावले होते. विशेष म्हणजे मिसबाहने त्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतक (१०१, १०१*) लगावले होते. मात्र लवकरच न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने हा विक्रम मोडला. मात्र, असे असले तरीही आशिया खंडात कसोटीमध्ये सर्वात जलद शतक लावण्याचा विक्रम अजूनही मिसबाहच्या नावे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–लोकल बॉय इन ॲक्शन! केएल राहुलला अँडरसनने ‘असं’ बाद करत इंग्लंडला मिळवून दिली पहिली विकेट
–धोनीबाबत विचारलेल्या ‘या’ प्रश्नाबाबत गांगुली-सेहवाग संभ्रमात, विशेष तज्ञांची घ्यावी लागली मदत
–बुमराहने वाढवली टीम इंडियाची चिंता! चौथ्या कसोटीत गोलंदाजीदरम्यान घ्यावे लागले होते उपचार