सौरव चंडीदास गांगुली या नावाला प्रिन्स ऑफ कोलकत्ता, ऑफ साईडचा देव आणि दादा नावांनी ओळखले जाते. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात थेट लॉर्ड्सवर खेळून तेथे त्याने शतक काढले होते. कर्णधार झाल्यावर तर, विक्रमांचे अनेक इमले रचले. त्यानेच भारतीय संघाला जिंकण्याची सवय लावली. काही लोक त्याला अहंकारी म्हणतात, कोणी हट्टी, कोणी काहीही म्हणत पण तो आपल्या गोष्टींवर ठाम असायचा. चॅपेल प्रकरण असो नाहीतर बीसीसीआयमध्ये काम करत असताना, रवी शास्त्री सोबतचा वाद, दादाने कायम जशास तसे उत्तर दिले.
आज त्यापैकी तीन अशा घटनांविषयी जाणून घेऊ, ज्यात आपल्या केलेल्या कृतीवर किंवा घेतलेल्या निर्णयावर अडून राहिला व सर्वांना दाखवून दिले की मीच दादा आहे.
३. स्टुअर्ट ब्रॉडला सुनावले
२००७ केनिंग्टन ओव्हल वनडे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३१६ धावा केल्या. भारताला ३१७ धावांच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागला. सचिन आणि गांगुलीच्या सलामीच्या जोडीने वेगाने धावा काढायला सुरुवात केली. स्टुअर्ट ब्रॉड डावातील नववे षटक फेकत होता. षटकातील शेवटच्या चेंडूवर सौरव गांगुली पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात चकला आणि चेंडू निर्धाव गेला.
युवा स्टुअर्ट ब्रॉड गांगुलीच्या दिशेने आला आणि काहीतरी पुटपुटला. गांगुलीने त्याला लगेच उत्तर दिले की,
“मी जेव्हा देशासाठी क्रिकेट खेळत होतो तेव्हा तू डायपर घालत असत. त्यामुळे गप्प बस. ”
पुढे नंतर जेव्हा ब्रॉड दुसरे षटक टाकण्यासाठी आला तेव्हा गांगुलीने सलग दोन चौकार ब्रॉडच्या डोक्यावरून मारले.
२. हरभजनसाठी निवडसमिती सोबत भिडला
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २००१, कोलकत्ता येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी संघनिवड सुरू होती. कर्णधार म्हणून गांगुली मिटींगला हजर होता. त्याला त्या मैदानाविषयी, तेथील परिस्थितीबद्दल सर्व काही माहित होते. तसेच, तो आपल्या संघातील सर्व खेळाडूंच्या क्षमतेविषयी जाणून होता.
दादाला संघात हरभजन सिंग हवा होता. निवडकर्ते हरभजनच्या कामगिरीवर इतके खूश नव्हते. त्यावेळी हरभजन एकदमच नवीन खेळाडू होता पण दादाला हरभजन हवा होता. दादा अडून बसला त्याने जाहीर करून टाकले की,
” जोपर्यंत हरभजनची निवड होत नाही तोपर्यंत मी या खोलीच्या बाहेर जाणार नाही.”
खूप वेळ चर्चा चालली आणि शेवटी निवडकर्त्यांना हरभजनला निवडावे लागले. त्याच सामन्यात हरभजनने हॅट्रिक घेत, पूर्ण सामन्यात मिळून १३ बळी आपल्या नावे केले. त्या सामन्यात सामनावीर देखील तोच ठरला.
१. लॉर्डसवर शर्ट काढला
सौरव गांगुलीच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे, २००२ मध्ये लॉर्ड्स येथे भारताने जिंकलेली नेटवेस्ट ट्रॉफी. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक बाल्कनीमध्ये भारतीय कर्णधार असलेल्या गांगुलीने भारत इंग्लंडला पराभूत करुन नेटवेस्ट ट्रॉफी जिंकल्यावर त्याचा टीशर्ट काढून फिरवला होता. त्याआधी इंग्लंडने जेव्हा भारताला वानखेडेत हरवले होते. तेव्हा असेच कृत्य अँड्र्यू फ्लिंटॉफने वानखेडेच्या मैदानात केले होते. त्याला उत्तर देण्याची संधी गांगुली शोधत होता. त्यादिवशी ती संधी दादाकडे चालून आली आणि त्याने ती गमावली नाही.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल इतिहासातील ५ सर्वोच्च वैयक्तिक खेळी; २ खेळाडूंनी तर दोनदा केलाय हा पराक्रम
४०० पेक्षा जास्त टी२० सामने खेळणारे ३ खेळाडू; तिघेही आहेत एकाच संघातील
महत्त्वाच्या बातम्या –
ज्या युवराजने ब्रॉडला ६ षटकार ठोकले, तोच युवराज आज ब्रॉडला म्हणतोय…
आयसीसी वनडे क्रमवारीत विराट कोहली अव्वल स्थानावर, तर रोहित आहे ‘या’ क्रमांकावर
आयपीएल २०२०चे वेळापत्रक बीसीसीआयने केले तयार; आता प्रतिक्षा फक्त संघांच्या मंजूरीची…