फेब्रुव्रारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात होती. शनिवारी (०६ मार्च) या मालिकेतीच चौथा आणि अखेरचा कसोटी सामना एक डाव आणि २५ धावांनी जिंकत भारताने ३-१ ने मालिकेत विजयी पताका झळकावली आहे. याबरोबरच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही प्रवेश मिळवला आहे.
युवा खेळाडूंमध्ये फिरकीपटू अक्षर पटेल, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी प्रतिभेची छाप सोडली. तर अनुभवी शिलेदारांमध्ये आर अश्विन, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांनीही दमदार प्रदर्शन केले. याउलट भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, शुबमन गिल यांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.
अशात भारतीय कसोटीत संघात इतर प्रतिभाशाली खेळाडूंची भरमार असल्याने खराब फॉर्ममध्ये असलेल्या काही खेळाडूंना संघातून वगळण्यात येऊ शकते. तर काही खेळाडू जे कसोटी पुनरागमनाची वाट पाहात आहेत, त्यांचे पर्याय संघात उपलब्ध असल्याने त्यांच्या प्रतिक्षेत भर पडू शकते. अशाच खेळाडूंचा आम्ही येथे आढावा घेतला आहे.
चला तर पाहूया, कोण आहेत ते खेळाडू
कुलदीप यादव-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात निवड होऊनही फिरकीपटू कुलदीप यादवला एकाही सामन्यात अंतिम ११ जणांच्या पथकात संधी मिळाली नव्हती. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध त्याला फक्त १ सामना खेळायला मिळाला. त्यातही त्याने फक्त २ विकेट्सची कामगिरी केली. दुसरीकडे भारतीय संघाकडे आर अश्विनसारखा अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. तसेच अष्टपैलू रविंद्र जडेजाही चांगली फिरकी गोलंदाजी करू शकतो. नुकतेच अक्षर पटेलनेही स्वतला सिद्ध केले आहे. त्यामुळे कुलदीपला कसोटी संघातून वगळण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
वृद्धिमान साहा-
वृद्धिमान साहा हा एक प्रतिभाशाली आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज आहे. परंतु यष्टीमागे जरी त्याने स्वतची कुवत दाखवून दिली असली, तरी फलंदाजीत तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्यातही यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने फलंदाजीसह यष्टीरक्षणातही छाप सोडली आहे. त्यामुळे साहाचे संघातील स्थान धोक्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळलेल्या साहाला कदाचित संघात पुन्हा जागा मिळणे जवळपास अशक्य झाल्याचे दिसत आहे.
शुबमन गिल-
युवा फलंदाज शुबमन गिल याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते आणि पूर्ण मालिकेत दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. याच कारणामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही संधी देण्यात आली. मात्र या पूर्ण मालिकेत तो संघर्ष करताना दिसला. चारही सामन्यात डावाची सुरुवात करताना तो फक्त ११९ धावा करू शकला. यादरम्यान त्याला केवळ एकदा अर्धशतक झळकावता आले. अशात केएळ राहुल, मयंक अगरवाल आणि देशांतर्गत स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत असलेल्या पृथ्वी शॉ हे गिलची जागा घेऊ शकतात.