इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १५ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर येत्या १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. भारतीय संघाला या स्पर्धेत विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. कारण भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे कुठल्याही क्षणी सामन्याचे चित्र बदलू शकतात. चला तर पाहूया, भारतीय संघातील ३ असे खेळाडू, जे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद मिळवून देऊ शकतात आणि मालिकावीर पुरस्काराचे मानकरी ठरू शकतात.
१) आर अश्विन – जेव्हा टी-२० विश्वचषक स्पर्धेची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी एका खेळाडूच्या निवडीने सर्वांनाच आश्चर्य झाले होते, तो म्हणजे फिरकीपटू आर अश्विन. तब्बल ४ वर्षे टी२० संघाबाहेर राहिल्यानंतर त्याला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत संधी देण्यात आली आहे. अश्विनला विश्वचषक स्पर्धा खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. त्याने २०११ आणि २०१५ विश्वचषक स्पर्धांसह २०१२, २०१४ आणि २०१६ टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच २०१३ आणि २०१७ मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत देखील त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. एखाद्या खेळाडूकडे आयसीसीच्या ८ स्पर्धांचा अनुभव असणे खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत तो महत्वाची भूमिका पार पाडताना दिसून येऊ शकतो.
२) हार्दिक पंड्या – आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी मोलाची भूमिका पार पाडू शकतो. कारण टी-२० विश्वचषक स्पर्धेसारख्या मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाला अशा एका खेळाडूची आवश्यकता आहे, जो कुठल्याही क्रमांकावर फलंदाजीला येऊन फटकेबाजी करू शकतो. तसेच गोलंदाजीमध्ये तो संघाला गडी बाद करून देऊ शकतो. हे त्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत दाखवून दिले होते.
३) केएल राहुल – केएल राहुल हा टी-२० क्रिकेटमधील सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याला पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी त्याने २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. शिखर धवनला संघाबाहेर करून त्याच्या ऐवजी केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर चांगली सुरुवात करून देण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोघेही आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत डावाची सुरुवात करताना दिसून येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलचा उभरता सितारा उमरानची ‘या’ मातब्बर वेगवान गोलंदाजाशी होतेय तुलना, व्हिडिओ चर्चेत
चेन्नई वि. पंजाब सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
आयपीएल कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिक