१८ नोव्हेंबर १९९९. हा तो दिवस आहे ज्या दिवशी श्रीलंका संघात एका अशा खेळाडूचे आगमन झाले होते. जो फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षण या सर्वांमध्ये माहिर होता. हा खेळाडू अर्थात तिलकरत्ने दिलशान. तो असा खेळाडू होता जो एकटा संघाचे पूर्ण संतुलन राखत असायचा. त्याच्या याच गोष्टीमुळे तो १६ वर्षे श्रालंका संघाचा भाग होता.
दिलशानने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत ८७ कसोटी सामन्यात ५४९२ धावा केल्या. यात त्याच्या १६ शतकांचा सावेश होता. तर, वनडेत ३३० सामन्यात २२ शतकांसह १०२९० धावा आणि टी२०त ८० सामन्यात एका शतकासह १८८९ धावा केल्या होत्या.
गमतीची गोष्ट ही आहे की, १६ वर्षात एवढी अफलातून कामगिरी करणाऱ्या या खेळाडूला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या १० वर्षांत विशेष कामगिरी करता आली नव्हती. त्याच्या खराब प्रदर्शनामुळे २००८साली त्याला संघातून बाहेर काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर मात्र त्याने असे दमदार पुनरागमन केले की तो संघातील कुमार संगाकारा, सनथ जयसूर्या आणि माहेला जयवर्धनेच्या अशा क्रिकेटपटूंच्या बरोबरीपर्यंत पोहोचला.
तर जाणून घेऊया, कशी दिलशानची कारकिर्द अचानक बदलली.Tillakaratne Dilshan’s life turning point.
१९९९ला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून दिलशानने वनडेतून श्रीलंका संघात पदार्पण केले होते. पदार्पणानंतर तब्बल ६ वर्षे म्हणजे २००५पर्यंत त्याला वनडेत एकही शतक करता आले नाही. अखेर २००५ला नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात त्याने वनडे कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले होते. यावेळी त्याने नाबाद ११७ धावा केल्या होत्या.
पुढे परत त्याला २ वर्षे वनडेत एकही शतक करता आले नव्हते. या २ वर्षात त्याने श्रीलंकाकडून ४८ वनडे सामने खेळत ७ अर्धशतके केली होती. त्यामुळे २००८मध्ये मायदेशातील भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील त्याच्या खराब प्रदर्शनामुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आले.
५ महिने संघातून बाहेर राहिल्यानंतर दिलशानला श्रीलंका संघातून पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली. यावेळी पुनरागमन केलेला दिलशान खूप बदलला होता. तत्कालिन श्रीलंका संघाचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस आणि कर्णधार जयवर्धने यांनी दिलशानला सलामीला फलंदाजी करण्यास पाठवायचे ठरवले. यावेळी त्याने सलामीला फलंदाजी करत कराची येथील वनडे सामन्यात ३३ चेंडूत ४२ धावा केल्या. तो इथेच थांबला नाही. पुढे त्याने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी करताना ७६ तर शेवटच्या सामन्यात नाबाद १३७ धावांची खेळी केली होती.
पुढे २००९ला वनडेत दिलशानने भारतविरुद्ध २ तर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध १ शतक ठोकले. त्याला पहिल्या क्रमांकावर फलंदाजी करायला मिळाल्यामुळे, त्याने २००९मध्ये १९ वनडे सामन्यात ५५.५५च्या सरासरीने १००० धावा केल्या होत्या.
तिथून त्याच्या कारकिर्दीला वेगळे वळण मिळाले. त्याने २०१०मध्ये २० वनडे सामन्यात ५१.१६च्या सरासरीने ९२१ धावा केय्ला. यात त्याच्या ३ शतकांचा समावेश होता. २०११मध्ये त्याने २ शतके ठोकत वनडेत ८२० धावा केल्या. विशेष म्हणजे २०११ला भारताने विश्वचषकात विजय मिळवला होता. त्या विश्वचषकात दिलशान हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने या विश्वचषकात ९ सामने खेळत ५०० धावा केल्या होत्या. यात त्याच्या २ शतकांचा आणि २ अर्धशतकांचा समावेश होता.
२०११ आणि २०१२ला दिलशानने ७ शतके ठोकत वनडेत ११००पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१५ या वर्षी तर त्याने अफलातून फलंदाजी केली. त्याने २०१५मध्ये ४ शतके आणि ६ अर्धशतके ठोकत १२०७ धावा केल्या होत्या.
एकेवेळेला आपल्या वनडे कारकिर्दीच्या सुरुवातीच्या ८ वर्षांत फक्त १ शतक ठोकणाऱ्या दिलशानने पुढील ८ वर्षांत तब्बल २१ शतके ठोकली. त्याची कसोटी आणि टी२०मधील कामगिरीही उल्लेखनीय ठरली. तो श्रीलंका संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात शतके करणारा एकमेव फलंदाज आहे.
यावरून हे कळून येते की दिलशानच्या कारकिर्दीतील टर्निंग पाँईन्ट म्हणजे त्याला सलामीला फलंदाजी करण्यासाठी मिळालेली संधी होय.