साल १९३२ पासून मे २०२२ पर्यंत भारतासाठी ३०३ कसोटी खेळाडू खेळलेत, १९७३ ला वनडे सुरु झाल्यावर २४३ आणि टी२० मध्ये ९७ खेळाडूंनी निळी जर्सी अंगावर चढवली. भारतीय क्रिकेटच्या या ९० वर्षांच्या इतिहासात काही क्रिकेटपटू असे होते, ज्यांच्या दोन पिढ्यांना भारताचे प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली. आजवर भारतीय क्रिकेटमध्ये पाच अशा पितापुत्रांच्या जोड्या राहिल्या, ज्यांच्या डोक्यावर टीम इंडियाची कॅप सजली. आज त्याच बाप-लेकाच्या जोड्यांविषयी आपण जाणून घेऊ.
अमरनाथ पिता-पुत्र
भारतासाठी खेळलेली सर्वात मान्यवर पिता-पुत्र जोडी म्हणजे पिता लाला अमरनाथ आणि त्यांचे दोन्ही पुत्र मोहिंदर व सुरींदर अमरनाथ. अमरनाथ कुटुंबाचे भारतीय क्रिकेटमधील योगदान अतुलनीय राहिले. लाला अमरनाथ हे स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले कर्णधार होते. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक झळकावणारे ते पहिले बॅटर. अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मोहिंदर अमरनाथ यांनी इंटरनॅशनल क्रिकेट गाजवले. भारताच्या ऑल टाईम ग्रेट ऑलराउंडर्समध्ये त्यांचा समावेश होतो. १९८३ विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाचे व्हाईस कॅप्टन होते. सेमीफायनल आणि फायनलला त्यांनी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवला. त्यामानाने सुरिंदर यांचे करिअर सीमित राहिले. १० कसोटी आणि ३ वनडेच्या पुढे त्यांचे करिअर जाऊ शकले नाही.
मांजरेकर पिता-पुत्र
देशाला अनेक महान क्रिकेटर देणाऱ्या मुंबईतून जे तीन विजय पुढे आले त्यापैकी एक म्हणजे विजय मांजरेकर. आपल्या लाजवाब कट आणि हूकने त्यांनी आपला वेगळा फॅनबेस तयार केला होता. ५५ कसोटीच्या करिअरमध्ये विजय मांजरेकर यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. विजय मांजरेकर यांच्यानंतर त्यांचा मुलगा संजय मांजरेकर यांनादेखील टीम इंडियासाठी खेळण्याचे सौभाग्य लाभले. संजय मांजरेकर यांना मात्र आपल्या वडिलांप्रमाणे भारतीय क्रिकेटसाठी भरीव योगदान देता आले नाही. त्यांना पुरेपूर संधी दिली गेली परंतु, त्यांचं करिअर सरासरीच राहील. असे असले तरी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे १०००० पेक्षा जास्त धावा आहेत. क्रिकेट करियरनंतर संजय यांनी कॉमेंटेटर म्हणून आपली सेकंड इनिंग सुरु केली आणि गाजवलीही.
बिन्नी पिता-पुत्र
साल १९८३ मध्ये टीम इंडियाने जिंकलेला विश्वचषक आणि १९८५ च्या वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेत ज्यांनी टीम इंडियाचा गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व केले ते बॉलर म्हणजे रॉजर बिन्नी. ८० च्या दशकात एक ख्यातनाम ऑलराऊंडर म्हणून बिन्नी यांची ओळख होती. भारतीय क्रिकेटमध्ये एक मानाचे स्थान असलेल्या बिन्नी यांचा सुपुत्र स्टुअर्ट हादेखील टीम इंडियासाठी खेळला. मात्र, आपल्या वडिलांप्रमाणे त्याच्या करिअरने उड्डाण घेतले नाही. इंडियन जर्सीमध्ये तो फक्त सहा कसोटी आणि चौदा वनडे खेळला. परंतु, बांगलादेशविरुद्ध त्याने ४ धावा देत ६ विकेट घेताना टाकलेला स्पेल टीम इंडियाकडून वनडेत टाकलेला सर्वोत्तम स्पेल आहे.
गावसकर पिता-पुत्र
केवळ भारतीय क्रिकेटर नव्हेतर, वर्ल्ड क्रिकेटमध्ये ज्यांचे नाव ऑल टाईम ग्रेट ओपनर म्हणून घेतले जाते, ते म्हणजे सुनील गावसकर. डॉन ब्रॅडमन यांचे अनेक विक्रम सर्वप्रथम मोडीत काढणारे बॅटर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वप्रथम १० हजाराचा पल्ला गाठणारेही गावसकरच. गावसकर हे विक्रमवीर असले तरी, त्यांचा मुलगा रोहन हा मात्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पुरता फ्लॉप ठरला. डावखुरा बॅटर असलेला रोहन टीम इंडियासाठी फक्त ११ वनडे खेळू शकला. असे असले तरी फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये तो चमकदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरला. क्रिकेट करियर लवकरच संपवत रोहनने कॉमेंटेटर होण्याचा मार्ग स्वीकारला.
योगराज-युवराज पिता-पुत्र
वरील सर्व बापलेकाच्या जोड्यांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसली की, वडील हे दिग्गज क्रिकेटर ठरले आणि मुलांचे करिअर फ्लॉप राहिले. परंतु शेवटची जोडी याला अपवाद ठरली. ती जोडी म्हणजे योगराज सिंग आणि युवराज सिंग यांची. फास्ट बॉलर असलेल्या योगराज यांनी एक कसोटी आणि वनडेनंतर पंजाबी सिनेजगताची वाट धरली. मात्र, त्यांचा मुलगा युवराजने क्रिकेट जगतावर अक्षरशः राज केले. १७ वर्षांच्या करिअरमध्ये युवराजने मोठमोठे यश मिळवले. टीम इंडियाला २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषकामध्ये चॅम्पियन बनवण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
एकेकाळचा भारतीय संघाचा ‘पोस्टर बाॅय’ ते सतत चर्चेत राहणारा टीम इंडियाचा प्रशिक्षक
IPL | कशी आहे नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी, जिथे रंगणार क्वालिफायर आणि फायनलचा थरार; घ्या जाणून
पराभवानंतर काय विचार करतोय KL Rahul, सोशल मीडियावर शेअर केली आश्चर्यचकित करणारी पोस्ट