मुंबई । कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता आयसीसीने चेंडूवर लाळ लावण्यास प्रतिबंध घातला आहे. आयसीसीच्या या नव्या नियमांवर काही आजी-माजी क्रिकेटपटूंनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काही जणांनी यावर उपायदेखील सुचवला आहे. भारताचा माजी 42 वर्षीय वेगवान गोलंदाज अजित आगरकरने आयसीसीला एक सल्ला दिला आहे .
तो म्हणाला, “कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चेंडूवर लाळ लावण्यास बंदी घालणे हे खेळाडूंना सुरक्षित ठेवण्यासाठी जरुरीचे होते. पण कोरोना विषाणूंवर नियंत्रण आल्यानंतर या नियमात शिथिलता देणे गरजेचे आहे. फलंदाजाला बॅट जितकी महत्त्वाची आहे तितकीच गोलंदाजासाठी लाळ महत्त्वाची गोष्ट आहे.”
“सामना होण्यापूर्वी खेळाडूंची तपासणी होणार आहेत. जर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह नसतील तर त्यांना लाळ लावण्यास परवानगी देण्यावर विचार करावा. या मुद्द्यावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळी चांगली माहिती देऊ शकतात.”
“सध्याच्या परिस्थितीवर आयसीसीच्या वैद्यकीय समिती पुढे यावर कोणताच उपाय नाही. चेंडूला चमक आणण्यासाठी दुसरा कोणताच उपाय नाही. समितीला यावर निर्णय घेणे अवघड आहे. सध्याच्या घडीला यावर कोणताच सुरक्षित उपाय नाही.”
“लाळ न लावल्याने काय परिणाम घडून येऊ शकतो हे आपल्याला इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू होणार्या कसोटी सामन्यानंतर कळून येईल. त्यासाठी आपणाला काही दिवसांची वाट पाहावी लागेल. क्रिकेट पहिल्यापासूनच फलंदाजाच्या बाजूने आहे. लाळ लावू न दिल्याने गोलंदाजांची स्थिती अधिकच दयनीय होईल.” असेही आगरकरने नमूद केले.
अजित आगरकरने 26 कसोटी सामन्यात 58 बळी टिपले तर 191 वनडे सामन्यात 288 बळींची नोंद त्याच्या नावावर आहे. वनडेत भारताकडून सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम अजित आगरकरच्या नावावर आहे. त्याने 2000 ला झिम्बाब्वे विरुद्ध 21 चेंडूत अर्धशतक केले होते. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. 2013 त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.
ट्रेंडिंग घडामोडी –
आजच्याच दिवशी भारताने पाकिस्तानला विश्वचषकात ७व्यांदा पाजले होते पाणी
‘फोडा आणि राज्य करा’ या नीतिचा अवलंब करणाऱ्या प्रशिक्षकावर हरभजनचा आरोप
९९ कसोटी खेळलेला क्रिकेटर म्हणतोय; मला टीम इंडियाचा कोच करा, मग पहाच…