हरारे स्पोर्ट्स क्लबवर आज क्रिकेटमधील मोठा इतिहास रचला गेला. आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातील महामुकाबल्यात भारतीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीने अविस्मरणीय खेळी साकारली. वैभवने आपल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडच्या गोलंदाजांना पूर्णपणे निष्प्रभ केलं आणि विक्रमांच्या पुस्तकात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं.
वैभव सूर्यवंशीने 175 धावांची भव्य खेळी करत अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान पटकावला. ही खेळी केवळ धावांची नव्हती, तर ती भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्याची झलक दाखवणारी ठरली. याआधी हा विक्रम राज बावा याच्या नावावर होता. त्याने नाबाद 162 धावांची खेळी करत हा मान मिळवला होता, मात्र वैभवने तो विक्रम मागे टाकला.
फायनलसारख्या मोठ्या सामन्यात वैभवच्या या ऐतिहासिक खेळीमुळे भारताने आपली स्थिती अत्यंत मजबूत केली आहे. त्याच्या फलंदाजीत दिसणारी परिपक्वता, संयम आणि आक्रमकता यामुळे तो या वयोगटातील सर्वोत्तम खेळाडूंच्या रांगेत जाऊन बसला आहे.
अंडर-19 विश्वचषकात भारतासाठी एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता वैभव सूर्यवंशी अव्वल स्थानी आहे. त्यानंतर राज बावा (162)* दुसऱ्या क्रमांकावर, तर अनुभवी सलामीवीर शिखर धवन तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. धवनने अनुक्रमे 155 आणि 146 धावा* करत आपली छाप सोडली होती. या यादीत पाचव्या स्थानावर अंगकृष रघुवंशी (144 धावा) आहे. याशिवाय मुशीर खान (131 धावा) आणि चेतेश्वर पुजारा (129)* यांसारख्या नावांचाही उल्लेख या मानाच्या यादीत आढळतो.
वैभव सूर्यवंशीची ही ऐतिहासिक खेळी केवळ वैयक्तिक विक्रमापुरती मर्यादित न राहता, भारताला अंतिम सामन्यात विजेतेपदाच्या दिशेने नेणारी ठरली आहे. भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी ही कामगिरी अत्यंत आशादायक मानली जात आहे.






