भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका भारताने ३-१ ने जिंकली आहे. या मालिकेनंतर १२ मार्चपासून या दोन संघात पाच सामन्यांची टी२० मालिका सुरु होत आहे. या टी२० मालिकेसाठी फारपुर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने भारतीय संघाची निवड केली आहे. मात्र या संघात निवड झालेल्या भारतीय खेळाडूंपैकी एक खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये दुसऱ्यांदा अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याचे टी२० संघातून बाहेर होणे जवळपास ठरल्यात जमा आहे.
संघात जागा मिळवण्यासाठी फिटनेस टेस्टमध्ये पास होणे अनिवार्य
मागील काही वर्षांपासून बीसीसीआय खेळोडूंची फिटनेस टेस्ट घेत येते. यात जे खेळाडू उत्तीर्ण होतात, तेच भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी पात्र ठरतात. सध्या बीसीसीआयने फिटनेस टेस्टसाठी नवीन मापदंड तयार केले आहेत. या नवीन मापदंडांनुसार खेळाडूंना यो-यो टेस्टमध्ये किमान १७.१ गुण मिळवावे लागतात किंवा ८.३ मिनिटात २ किलोमीटर अंतर धावावे लागते.
हा खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये पुन्हा अपयशी
भारतीय संघात इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवड झालेला २९ वर्षीय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती दुसऱ्यांदा बीसीसीआयच्या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला आहे. याआधी झालेल्या फिटनेसमध्येही तो उत्तीर्ण झाला नव्हता. परंतु त्याला अजून एक संधी देण्यात आली होती. मात्र दुसऱ्या संधीतही तो उत्तीर्ण न झाल्याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल.
याविषयी पीटीआयला माहिती देताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “वरुण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी झालेल्या दुखापतीतून सावरला होता. त्यामुळे त्याची इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. खांद्याच्या दुखापतीनंतर त्याने बंगळुरूच्या एनसीएसमध्ये पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण केला. त्यानंतर तो व्यवस्थित गोलंदाजीही करताना दिसला. परंतु निर्धारित वेळेत २ किलोमीटर अंतर पार करण्याच्या यो-यो टेस्टमध्ये तो अपयशी ठरला. जर कोणता खेळाडू संघाचे मापदंड पूर्ण करू शकत नसेल, तर त्याला संघात जागा देणे अशक्य आहे.”
आयपीएलमधील कामगिरीमुळे मिळाली होती संधी
‘मिस्ट्री स्पिनर’ म्हणून ओळखला जाणारा वरुण याने आयपीएल २०२० च्या हंगामात चांगल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर वरुणची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. पण त्याआधीच त्याला दुखापत झाल्याने या दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. आता त्याला पुन्हा एकदा भारतीय संघात संधी मिळाली होती. परंतु फिटनेस टेस्टमुळे पुन्हा त्याने ही संधी हातून घालवली आहे.
वरुण चक्रवर्तीच्या जागी या खेळाडूला जागा
आता वरुणच्या जागी राहुल चाहरला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून भारतीय संघासोबत आहे. याबरोबरच तो मागील काळापासून जैव सुरक्षित वातावरणात असल्याने त्याला सहभागी करण्यात संघाला कसलीही अडचण येणार नाही.
टी२० मालिकेसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.
महत्त्वाच्या बातम्या-
जुनं ते सोनं! जी जर्सी अंगावर चढवून सचिनने विश्वचषक खेळला, त्याच जर्सीत पुन्हा उतरणार टीम इंडिया
पंत का राहुल, टी२० संघात कोणाला मिळणार संधी? पाहा काय म्हणाले फलंदाजी प्रशिक्षक
‘सिक्सर किंग’ ही उपमा सर्वात आधी मिळवणाऱ्या ‘या’ भारतीय क्रिकेटरला ओळखले का? पाहा फोटो