सध्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२१) हंगाम अंतिम टप्प्याकडे आला आहे. या विश्वचषकानंतर लगेच टी२० विश्वचषक खेळला जाईल. या विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी एक चिंतेची गोष्ट समोर आली आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेला तमिळनाडूचा मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्ती हा आयपीएलदरम्यान दुखापतग्रस्त झाला असून, यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) व संघ व्यवस्थापनाच्या चिंतेत भर पडली आहे.
वरूण झाला दुखापतग्रस्त
वरूण चक्रवर्ती सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे (केकेआर) प्रतिनिधित्व करतो. युएई येथे खेळविण्यात येत असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात तो दुखापतग्रस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या गुडघ्यामध्ये वेदना होत असल्याची माहिती मिळतेय. केकेआरचे फिजिओ आणि इतर मेडिकल स्टाफ त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.
भारतीय संघाची वाढली चिंता
वरूण चक्रवर्ती दुखापतग्रस्त झाल्याची बातमी समोर आल्याने भारतीय संघ व्यवस्थापनाच्या चिंतेत भर पडली आहे. कारण, मिस्ट्री स्पिनर म्हणून वरूणला या विश्वचषकासाठी संधी देण्यात आली आहे. गेली चार वर्षात भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू असलेला युजवेंद्र चहल याला मात्र या संघात स्थान दिले गेले नाही. वरूण विश्वचषकासाठी उपलब्ध नसल्यास भारतीय संघाला आपल्या योजना बदलणे भाग पडेल. भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात २४ ऑक्टोबरपासून पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने होईल. वरूणची दुखापत गंभीर असल्यास १० ऑक्टोबरपर्यंत भारतीय संघात बदल होऊ शकतो.
अप्रतिम फॉर्ममध्ये आहे वरूण
वरूण चक्रवर्ती सध्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. केकेआरसाठी त्याने आत्तापर्यंत शानदार कामगिरी करत १३ सामन्यांमध्ये १५ बळी मिळवले आहेत. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ६.७३ असा अप्रतिम राहिला आहे. वरूणने नुकतेच श्रीलंका दौऱ्यातून आपले आंतरराष्ट्रीय पुनरागमन केले होते.