---Advertisement---

पहिल्यांदा 20 लाख मिळाल्यानंतर काय होती अवस्था? विराटने सांगितला जुना किस्सा!

On: शनिवार, मे 3, 2025 3:01 PM
---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील 52वा सामना आज (3 मे) चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) संघात खेळला जाईल. तत्पूर्वी स्टार फलंदाज विराट कोहलीने सांगितले की, जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ आयपीएलमध्ये बेंगळुरूमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध खेळतो तेव्हा तेथील वातावरण सर्वात रोमांचक असते. आयपीएल 2024 मध्ये जेव्हा आरसीबीने बंगळुरूमध्ये सीएसकेविरुद्ध सामना केला तेव्हा त्यांनी प्लेऑफमध्ये 27 धावांनी रोमांचक विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. या हंगामाच्या सुरुवातीलाही दोन्ही संघ चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर आमने-सामने आले, जिथे आरसीबीने 50 धावांनी विजय मिळवला.

कोहलीने जिओहाॅटस्टारवर सांगितले की, “जर मला विचारले गेले की कोणत्या संघाचा सामना सर्वात कठीण आणि रोमांचक आहे, तर मी म्हणेन चेन्नई सुपर किंग्जसह, विशेषतः बंगळुरूमध्ये. अर्थात, सीएसके चाहते सर्वत्र असतात. जेव्हा आपण बंगळुरूमध्ये सीएसके विरुद्ध खेळतो तेव्हा एक वेगळेच वातावरण तयार होते. कारण चेन्नईचे चाहते मोठ्या संख्येने बंगळुरूमध्ये येतात. ते जास्त तिकिटे बुक करतात आणि स्टेडियमचा एक भाग ताब्यात घेतात. यामुळे, सीएसकेविरूद्धच्या सामन्यादरम्यान बंगळुरूच्या स्टेडियममध्ये खूप उत्साह आणि तणाव असतो. नंतर सामना देखील खूप स्पर्धात्मक असतो. मला हे वातावरण सर्वात रोमांचक वाटते.”

आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत 443 धावा काढणाऱ्या कोहलीने 2008 मधील पहिल्या आयपीएल हंगामातील त्याचे अनुभवही आठवले. तो म्हणाला, “पहिले वर्ष खूप रोमांचक होते कारण सर्व काही नवीन आणि अज्ञात होते. आम्ही जास्त टी20 क्रिकेट खेळलो नव्हतो. फ्रँचायझी क्रिकेटमुळे आम्हाला जगभरातील मोठ्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली, ज्यांना आम्ही आदर्श मानत होतो. जेव्हा लिलाव झाला तेव्हा आम्ही मलेशियातील क्वालालंपूरमध्ये होतो. आम्हाला प्रथम श्रेणीचे खेळाडू मानून 20 लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. ‘आम्हाला 20 लाख मिळाले’ या आनंदाने आम्ही वेडे झालो. कारण पुढे काय होईल याची आम्हाला कल्पना नव्हती. उद्घाटन समारंभात मोठ्या खेळाडूंना भेटणे हे सर्व स्वप्नासारखे होते.”

शेवटी कोहली म्हणाला, “हा एक लांब प्रवास आहे. आम्ही आयपीएल सुरू होताना आणि सतत वाढत असल्याचे पाहिले आहे. खरे सांगायचे तर, जेव्हा ते सुरू झाले तेव्हा आम्हाला वाटले नव्हते की ते इतके मोठे होईल, परंतु आज 18 वर्षांनंतरही, दरवर्षी आम्हाला तोच उत्साह जाणवतो, खरं तर त्याहूनही जास्त. याचे श्रेय लीग, तिचे उत्कृष्ट नियोजन, संघांमधील स्पर्धा आणि सर्वकाही ज्या व्यावसायिक पद्धतीने हाताळले जाते त्याला जाते.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---