रविवारी (5 जानेवारी) गुवाहाटी (Guwahati) येथे भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात 3 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील पहिला सामना (First Match of 3 T20 series) पार पडणार आहे.
या दरम्यान भारतात सध्या नागरिकत्व सुधारित कायद्यामुळे (CAA) सर्वत्र तणावाचे वातावरण आहे. सीएएमुळे गुवाहाटीमध्ये जोरदार आंदोलने झाली होती. पण या मुद्यावर भाष्य करणे भारताचा कर्णधार विराट कोहलीने टाळले आहे.
“सीएए या विषयावर मी आता कोणत्याही प्रकारचे बेजबाबदारपणे काहीही बोलणार नाही. ज्यामुळे वेगवेगळे विचार केले जातील. मला या विषयाबद्दल अधिक माहिती घेण्याची आवश्यकता आहे. याचे काय महत्त्व आहे हे माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे मी यानंतर जबाबदारपणे माझे विचार व्यक्त करेल,” असे पहिल्या टी20 सामन्यापूर्वी विराट म्हणाला.
यापूर्वी 2016 मधील नोटबंदीला (Demonetisation) विराटने ‘भारतातील राजकारणात मोठे पाऊल’ म्हटले होते. विराटच्या या वक्तव्यानंतर लोकांनी त्याच्या या वक्तव्यावर टीका केली होती.
त्यामुळे आता विराटने ‘सीएए’बद्दल स्पष्टपणे सांगितले आहे की, पूर्ण माहिती घेतल्याशिवाय या विषयावर बोलण्यापासून मी सावध राहील. ज्यामुळे कोणताही वाद निर्माण होऊ नये.






