भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. १८ ते २२ जून या कालावधीत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळल्यानंतर भारतीय संघ ऑगस्ट महिन्यापासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. या दौऱ्यावर भारताचे नेतृत्व करत असलेल्या विराट कोहलीने २०१४ चा इंग्लंड दौरा ते २०१८ चा इंग्लंड दौरा या काळात आपण स्वतःमध्ये कसा बदल केला, याबाबतचा खुलासा केला आहे.
मी माझा अहंकार बाजूला ठेवला होता
विराट कोहली याने आतापर्यंत दोन वेळा इंग्लंडचा दौरा केला आहे. २०१४ मध्ये झालेल्या पहिल्या दौऱ्यावेळी तो कमालीचा अपयशी ठरला होता. त्यानंतर, २०१८ मध्ये कर्णधार या नात्याने खेळताना त्याने उत्कृष्ट कामगिरी केली.
या मधल्या काळात आपण स्वतःमध्ये कशी सुधारणा केली याबाबतचा खुलासा करताना कोहली म्हणाला, “जून २०१८ पर्यंत इंग्लंडमध्ये माझी कामगिरी म्हणजे आपत्ती होती. मात्र, ऑगस्ट महिना उजाडताच मी तेथील मास्टर बनलेलो. २०१४ च्या दौऱ्यानंतर मी जवळपास वर्षभर विचार करत होतो की, इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी कशी करता येईल. त्यावेळच्या कामगिरीने मी खूपच निराश झालो होतो.”
कोहलीने आपल्या यशाचे गमक सांगताना म्हटले, “मी मनाशी पक्के केले की, इंग्लंडमध्ये धावा बनविल्या नाही तरी फरक पडत नाही. प्रत्येक ठिकाणी मला स्वतःला सिद्ध करायचे नाही, असा चंग मी बांधला. २०१८ दौऱ्यावेळी मी अहंकार बाजूला ठेवला होता. परिस्थितीचा सन्मान करून, वेळ घेऊन मोठी खेळी करण्याचा माझा मानस होता. ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केल्याने माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला.”
दोन्ही दौर्यात अशी होती कामगिरी
विराटने २०१४ इंग्लंड दौऱ्यामध्ये पाच कसोटी सामने खेळताना दहा डावात मिळून १३.५० च्या खराब सरासरीने केवळ १३४ धावा जमवल्या होत्या. या दौर्यात तो जेम्स अँडरसनचा शिखर ठरलेला. त्यानंतर झालेल्या २०१८ दौऱ्यामध्ये त्याने मागील अपयशाचे उट्टे काढताना १० डावांत ५७.८५ च्या अफलातून सरासरीने ५९३ धावा ठोकल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
द्रविडची माणुसकी! टॅक्सी सोडून पाकिस्तानी खेळाडूंशी रस्त्यावर चर्चा केली, वाचा ‘त्या’ घटनेबद्दल
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, पुणेकर ऋतूराज गायकवाडला मिळाले स्थान; पाहा कोण झालंय कर्णधार