रविवारी (१४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ८ विकेट्सने पराभूत केले आणि त्यांचा पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. या विजयासह कर्णधार एरॉन फिंचने ऑस्ट्रेलिया संघासाठी इतिहास रचला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य २ विकेट्सच्या नुकसानावर आणि १८.५ षटकात गाठले. कर्णधार एरॉन फिंचने संपूर्ण टी-२० विश्वचषकादरम्यान संयम बाळगला आणि काही महत्वाचे निर्णय घेतले, ज्यामुळे अंतिम सामन्यात त्यांच्या संघाने विजय मिळवला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीकडूनही फिंचप्रमाणे निर्णय घेण्याची अपेक्षा होती.
तत्पूर्वी पाकिस्तान आणि इंग्लंडला जेतेपद जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. पण न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघांनी उपांत्य सामन्यात त्यांचा पराभव केला आणि अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले होते. सुरुवातीला भारतीय संघालाही टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते, पण भारत उपांत्य सामन्यपर्यंतही पोहोचू शकला नाही. त्यानंतर भारताचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीवर अनेक टीका करण्यात आल्या. अजूनही विराट कोहलीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
फिंचने खेळाडूंवर विश्वास दाखवला
टी-२० विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला पाहून अनेक दिग्गजांनी आणि चाहत्यांनी एरॉन फिंचवर निशाणा साधला होता. पण त्याने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि संघातील खेळाडूंवर विश्वास ठेवला. विराट कोहली या गोष्टीत कुठेतरी कमी पडल्याचे दिसते. विराटने बाहेरच्या गोष्टींकडे फिंचप्रमाणेच थोडे कमी लक्ष दिले पाहिजे होते आणि संघातील खेळाडूंवर अधिक विश्वास दाखवला पाहिजे होता. विराट कोहलीने स्पर्धेदरम्यान ज्या चुका केल्या, त्या एरॉन फिंचही करू शकत होता. मात्र, त्याने संयम बाळगला आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे.
एरॉन फिंचने त्याच्या संघातील खेळाडूंवर विश्वास दाखवला. सलामीवीर डेविड वॉर्नर खराब फॉर्मशी झगडत असतानाही त्याला टी-२० विश्वचषकात संघात कायम ठेवले गेले. वॉर्नरनेही उपांत्य आणि अंतिम सामन्यात महत्वाची खेळी करूत तो त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासाला पात्र आहे, हे सिद्ध केले.
कोहलीने दुसऱ्या सामन्यातच केले मोठे बदल
कर्णधार विराटने मात्र पहिल्या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुलची जोडी अपयशी ठरल्यानंतर पुढच्या सामन्यात फलंदाजी क्रमात मोठा फेरबदल केला. दुसऱ्या सामन्यात ईशान किशनला डावाची सुरुवात करायला पाठवले आणि रोहितला मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली होती.
दुसरीकडे ऑस्ट्रलियाचा ग्लेन मॅक्सवेलही संपूर्ण विश्वचषकादरम्यान अपयशी ठरला होता. पण कर्णधार फिंचने सतत त्याला संधी आणि अंतिम सामन्यात त्याने २८ धावांची नाबाद खेळी करून महत्वाची भूमिका पार पाडली.
दरम्यान, सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १७२ धावा केल्या होत्या. यामध्ये मार्टिन गप्टिलने २८ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाच्या जोस हेजलवूडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य १८.५ षटकात गाठले. ऑस्ट्रेलियासाठी मिशेल मार्शने सर्वाधिक ७७ धावांची नाबाद खेळी केली. यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले. तसेच सलामीवीर डेविड वार्नरने (५३) त्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि तो टी२० विश्वचषकात मालिकावीर ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
T20 WC Final: मोठ्या सामन्यात माती खाणाऱ्या न्यूझीलंड संघावर मिम्सचा वर्षाव, भन्नाट विनोदही बनले
चँपियन ऑस्ट्रेलियाला चाहत्यांकडून ‘गार्ड ऑफ हॉनर’, बँड बाजाच्या आवाजाने चढवली रंगत; व्हिडिओ व्हायरल