भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian cricket women’s team) शनिवार (5 सप्टेंबर) दुबईत होणाऱ्या आशिया कपच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पूर्ण (Ind vs Pak) आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. संघाची अलीकडील कामगिरी आणि मागील रेकॉर्ड पाहता भारताचं पारडं जडं असल्याचे दिसत आहे.
या सामन्याबाबत भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने (Deepti Sharma) मोठे विधान केले आहे. तिने सांगितले की, टीम इंडिया नेहमीच प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक पाऊल पुढे असते आणि आपल्या रणनीतीवर ठाम राहते. म्हणूनच पाकिस्तानविरुद्ध भारताचा रेकॉर्ड इतका शानदार आहे.
पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा रेकॉर्ड अत्यंत दमदार राहिला आहे. वनडे (ODI) क्रिकेटमध्ये भारत आजवर पाकिस्तानकडून कधीही पराभूत झालेला नाही, तर टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानने भारताला शेवटचा पराभव ऑक्टोबर 2022 च्या आशिया कपमध्ये दिला होता. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या एकूण 17 टी-20 सामन्यांपैकी पाकिस्तानला केवळ 3 वेळाच विजय मिळवता आला आहे.
अलीकडेच टी-20 विश्वचषक 2026 मध्ये जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा भारताने सहज विजय मिळवला होता. त्या सामन्यात भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 षटकांत केवळ 10 धावा देऊन 5 विकेट घेतल्या होत्या, ज्याने सामन्याचा ओघ पूर्णपणे भारताच्या बाजूने वळवला होता.
दीप्ती शर्मा म्हणाली की, पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या अलीकडील विजयांचे कारण कोणतीही मानसिक आघाडी नसून, मैदानात आपल्या रणनीतीची योग्य अंमलबजावणी करणे हे आहे.
रिपोर्ट्सनुसार, प्री-मॅच पत्रकार परिषदेत दीप्ती म्हणाली की, पहा, तसा कोणताही वेगळा फायदा किंवा दबाव नाही. विषय फक्त एवढाच आहे की, आम्ही त्यांच्याविरुद्ध जे सामने जिंकले आहेत, मग तो आशिया कप असो किंवा इतर कोणताही सामना, आम्ही नेहमी त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहिलो आहोत. हेच आमचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
दीप्ती शर्माच्या मते, सध्या संपूर्ण भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करत असून फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्या मजबूत व संतुलित दिसत आहेत. सामन्याच्या दिवशी ज्या खेळाडूची कामगिरी चांगली होते, ती खेळाडू संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करते आणि इतर खेळाडू सकारात्मक वातावरण राखण्यासाठी तिला पूर्ण साथ देतात. थायलंड आणि हाँगकाँगचा मोठ्या फरकाने पराभव केल्यानंतर भारताने आधीच उपांत्य फेरीत (Semifinals) आपले स्थान निश्चित केले असून संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. याच कारणामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कोणत्याही मोठ्या दबावाशिवाय मैदानात उतरेल.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल बोलताना भारताच्या स्टार अष्टपैलू खेळाडूने सांगितले की, आमचा संघही चांगला आहे आणि त्यांचे गोलंदाजही उत्तम आहेत, हे आम्हाला माहीत आहे. पण आमचे मुख्य लक्ष आमच्या स्वतःच्या ताकदीवर आणि क्षमतेवर आहे. मी आधीही सांगितले तसे, आम्हाला फक्त चांगला आणि दर्जेदार क्रिकेट खेळायचा आहे आणि आमचे संपूर्ण लक्ष याच गोष्टीवर केंद्रित आहे.” दीप्तीने पुढे सांगितले की, आमचे उद्दिष्ट केवळ चांगलं क्रिकेट खेळणे हे आहे. फलंदाजी असो वा गोलंदाजी, संपूर्ण संघाने मागील दोन सामन्यांप्रमाणेच एकत्रित येऊन खेळणे गरजेचे आहे.






