आयपीएल २०२१ चा थरार आता संपला आहे. आता क्रिकेट चाहत्यांना टी२० विश्वचषकाचे वेध लागले आहेत. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत १६ संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आपला सर्वोत्तम प्रयत्न करताना दिसतील. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा १५ सदस्यीय संघही दुसऱ्यांदा हे जेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या घातक गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करणारा युझवेंद्र चहल त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे.
क्रिकेट वर्तुळात अशी चर्चा होती की, १५ ऑक्टोबरपूर्वी होणाऱ्या संघ बदलात चहलला राहुल चाहरच्या जागी संधी दिली जाईल. पण निवडकर्त्यांनी राहुलवर विश्वास दाखवला. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने चहलपेक्षा राहुल चाहरला का प्राधान्य दिले, हे सांगितले आहे.
टी२० विश्वचषक सुरू होण्याआधी पत्रकार परिषदेत बोलताना कोहली म्हणाला, ‘ हा एक खूप कठीण निर्णय होता, पण आम्ही एका कारणास्तव राहुल चाहरला निवडण्याचा निर्णय घेतला. त्याने गेल्या अनेक आयपीएल हंगामात सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे.’
‘चाहरचे वैशिष्ट्य म्हणजे तो वेगात फिरकी गोलंदाजी करतो. त्याने श्रीलंकेत आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती. याशिवाय त्याने त्या मालिकेत मोक्याच्या क्षणी गोलंदाजी केली होती. आम्ही स्पर्धेत असे गृहीत धरून चालत आहोत की खेळपट्टी जेव्हा संथ होत जाईल, तेव्हा निव्वळ फिरकी टाकणाऱ्या गोलंदाजापेक्षा वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज फलंदाजास अधिक त्रासदायक ठरेल. राहुलमध्ये साहजिकच ती क्षमता आहे,’ असंही विराट म्हणाला.
तसेच विराट पुढे म्हणाला, ‘तो त्या गोलंदाजांपैकी एक आहे, जो नेहमी खेळपट्टीनुसार बदल करतो आणि हीच गोष्ट त्याच्या बाजूने गेली आहे. विश्वचषक संघ निवडणे हे एक कठीण काम असते आणि आपण नेहमीच प्रत्येकाला संघात ठेवू शकत नाही.
विराटने यावरही भाष्य केले की धोनी एक मार्गदर्शक म्हणून संघासाठी कसा फायदेशीर ठरेल. तो म्हणाला, ‘त्याला खूप अनुभव आहे तो स्वतः संघात येण्यास उत्सुक आहे. आम्ही आमची कारकीर्द सुरू केल्यापासून तो आमचा मार्गदर्शक राहिला आहे. धोनीचा त्या युवा खेळाडूंना खूप फायदा होईल, जे पहिल्यांदाच इतकी मोठी स्पर्धा खेळत आहेत. एखाद्या कठीण समस्येत त्याचे मार्गदर्शन आणि सरावादरम्यान त्याने दिलेल्या सल्ल्यामुळे आमचा खेळ किमान एक ते दोन टक्क्यांनी सहज सुधारेल. त्याच्या उपस्थितीमुळे आम्ही खूप आनंदी आहोत. त्याच्या उपस्थितीमुळे केवळ आमचा उत्साह वाढणार नाही तर आत्मविश्वास देखील वाढेल.’
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकानंतर शास्त्रींबरोबरच ‘हे’ दिग्गजही सोडू शकतात टीम इंडियाची साथ
‘कोहलीआधी पुजारा बनला चँपियन, कोणत्या जगात राहतोय आपण!’, सीएसकेचा विजय अन् पुजारा होतोय ट्रेंड
फटाक्यांची आतषबाजी अन् फुलांची उधळण, सीएसकेच्या ऋतुराजचे पुण्यात धूमधडाक्यात स्वागत