भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकतीच बॉर्डर-गावसकर मालिका पार पडली. भारताने या मालिकेत उत्तम कामगिरी करत मालिका 2-1 ने जिंकली. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयात सर्वच खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. विशेषतः मालिकेतील शेवटच्या सामन्यात आपले पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाजी सोबतच फलदाजीत देखील उत्तम कामगिरी केली.
त्याच्या या कामगिरीबद्दल संपूर्ण क्रिकेट वर्तुळाकडून त्याचे कौतुक होत आहे. अशातच मालिका संपल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरची प्रतिक्रिया समोर येत असून, त्याने रवी शास्त्री यांच्या शब्दांनी आत्मविश्वास मिळाल्याचे म्हटले आहे.
सुंदर म्हणाला, “जर मला भारताकडून कसोटी सामन्यात डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली तर ती विशेष बाब असेल. मी अशा प्रसंगाला आमचे कोच रवी शास्त्री यांच्याप्रमाणेच एक आव्हान म्हणून पार पाडेल.”
रवी शास्त्रींबद्दल बोलताना सुंदर म्हणाला, “रवी सर यांनी आम्हाला त्यांच्या खेळण्याच्या कालावधीतील अनुभव सांगितले. रवी सरांनी सांगितले की कशाप्रकारे त्यांनी पहिल्या सामन्यात दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत 4 बळी देखील मिळवले होते. त्यानंतर ते भारताकडून सलामीवीराच्या भूमिकेत देखील खेळले. मी देखील त्यांच्याप्रमाणे डावाच्या सुरुवातीला फलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहे.”
सुंदरने ब्रिस्बेन येथे आपले कसोटी पदार्पण केले होते. त्याने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात 3 प्रमुख फलंदाजांना बाद केले. तसेच, भारताच्या पहिल्या डावात शानदार 62 धावांची खेळी देखील केली. सुंदरने शार्दुल ठाकुर सोबत सातव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी करत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातही सुंदरने एक बळी मिळविला होता. सुंदरचे विशेष कौतुक झाले ते भारताच्या दुसऱ्या डावातील त्याच्या आत्मविश्वासपूर्ण खेळीने. भारताच्या दुसऱ्या डावात अतिशय महत्त्वाच्या क्षणी सुंदरने 22 धावांची खेळी करत संघाला सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
महत्वाच्या बातम्या:
इंग्लंडने आपला सर्वोत्तम ताकदीचा संघ न उतरवणे, हा भारताचा अपमान असेल