मागीलवर्षी भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यातील वाद प्रकरण भारतीय क्रिकेट वर्तुळात चांगलेच गाजले होते. या प्रकरणानंतर कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामाही दिला होता. आता या प्रकरणाबद्दल भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हिव्हिएस लक्ष्मणने एक खुलासा केला आहे.
लक्ष्मण, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांचा समावेश असणाऱ्या बीसीसीआयच्या सल्लागार समीतीला कुंबळेनेच भारतीय संघाचे प्रशिक्षकपदाची जबाबदारी कायम करावी असे वाटत होते. परंतू विराटबरोबर झालेल्या मतभेदानंतर कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणे पसंत केले, असे लक्ष्मणने सांगितले आहे.
विराट- कुंबळे वाद मागीलवर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दरम्यान समोर आला होता. या प्रकरणाबद्दल एका चॅनेलला माहिती देताना लक्ष्मण म्हणाला, ‘मला वाटत नाही की विराटने त्याची सीमा पार केली होती. आमच्या समीतीला वाटत होते की अनिलने प्रशिक्षकपदाची जबाबदारी कायम करावी. पण त्याने विचार केला की राजीनामा देऊन पुढे जाणेच योग्य आहे. ते वाद प्रकरण हे कडवटपणाची चव देणारे होते.’
तसेच पुढे लक्ष्मण म्हणाला, ‘चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी वाईट पद्धतीने तो सर्वांसमोर आला ते मला पटले नाही. सल्लागार समीती अनिलला प्रशिक्षकपदी कायम करु इच्छित होती. पण ते प्रकरण ही खूप दुर्दैवी होते.’
‘मी नेहमी लोकांना सांगतो की सल्लागार समीती ही विवाह सल्लागार नाही. आमचे एखाद्या पदासाठी सर्वोत्तम व्यक्तीची निवड करणे हे काम आहे. आम्ही ती प्रक्रिया पूर्ण केली होती. पण दुर्दैवाने विराट आणि कुंबळे खूप काळ एकत्र काम करु शकले नाहीत.’
कुंबळेने 2017 मध्ये प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्रींवर प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहली सेना कंट्रीजमध्ये कमनशीबीच, नकोसा विक्रम झाला नावे
–टीम इंडियाला तिसरी कसोटी जिंकायची असेल तर हा शिलेदार संघात हवाच- मायकल हसी
–न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या या मोठ्या खेळाडूला संघातून डच्चू






