---Advertisement---

आर्थिक संकटात अडकलेल्या श्रीलंकेला आता फक्त क्रिकेटच वाचवू शकतं, कसं ते वाचा सविस्तर

Sri-Lanka
---Advertisement---

मागच्या काही दिवसांपासून आपल्या बांधाला बांध असलेल्या सॉरी बॉर्डरला बॉर्डर असलेल्या श्रीलंकेत जबरदस्त अराजकता माजलीये. राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. भ्रष्टाचार आणि महागाईच्या मुद्द्यावरून जनता रस्त्यावर उतरलीय. रस्त्यावर उतरून ते फक्त आंदोलन करत नाहीत, तर सरकारमधील लोकांच्या हत्या आणि त्यांची घरं जाळण्यापर्यंत लोकांची मजल गेलीये. राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान सारेच लपून बसलेत. अती केलं मातीत गेलं अशीच काहीशी त्यांची भावना असेल.

असो. देशात हे सर्व घडत असताना तिथले सर्वात मोठे हिरो असलेले क्रिकेटर, सरकारच्या दावणीला न बांधले जाता या आंदोलनांमध्ये उतरत आहेत. अगदी सुरुवातीपासून सनथ जयसूर्या, रोशन महानामा या सरकारविरोधी आंदोलनाचा हिस्सा आहेत. इतरही आजी-माजी क्रिकेटर सोशल मीडियावरून रान पेटवत आपण देशातील जनते सोबतच आहोत याची ग्वाही देत आहेत. देशाची ही स्थिती आता झाली असली, तरी मागच्या काही वर्षांपासून, तिथल्या लोकांना सर्वाधिक आनंद देणारी गोष्ट म्हणजे क्रिकेटही अगदी रसातळाला गेलेय.

श्रीलंका क्रिकेट संघाने बरीच वर्ष सुवर्णकाळ पाहिला. १९९२ पासूनच खरंतर श्रीलंका मेन स्ट्रीम क्रिकेटमध्ये ओळखली जाऊ लागली. जयसूर्या कालुवितरण जोडी जगात भारी म्हणता येईल अशी होती. हसन तिलकरत्ने आणि अरविंद डिसिल्वा जगातील कोणत्याच टॉप बॅटरपेक्षा कमी नव्हते आणि ज्याने फक्त श्रीलंका क्रिकेटच नाही, तर अख्ख्या देशाला एकसंध केले तो अर्जुन रणतुंगा कोणी कसा विसरेल? श्रीलंका क्रिकेटच्या या पहिल्या पिढीनंतर दुसरी पिढी आणखी कर्तुत्ववान निघाली. ज्या डिसिल्वा रणतुंगाने श्रीलंका क्रिकेटला ओळख मिळवून दिली, ती ओळख पुढे दहशतीत बदलण्याचे काम दुसऱ्या पिढीने केले. मुथय्या मुरलीधरन, चामिंडा वास बॉलिंगमध्ये भल्याभल्यांना गारद करायचे. बॅटिंग लाईनअप तर एखाद्याची नजर लागली अशी होती. ओपनर मर्वान अटापटू‌ जोडीला अनुभवी जयसूर्या असायचाच. मिडल ऑर्डरची जबाबदारी दोन खांब जयवर्धने आणि संगकाराच्या खांद्यावर. बाकी मेंडिस, मॅथ्यूज, मलिंगा, समरविरा कधी संघाला निराश करत नसायचे.

हेही पाहा- क्रिकेटच पुनर्जीवन झालं की श्रीलंकेत सारं काही आलबेल होऊ शकतं 

२००७ ते २०१४ हा श्रीलंकन क्रिकेटचा गोल्डन पिरेड म्हणता येईल. म्हणजे २००७ आणि २०११ अशा सलग दोन वनडे वर्ल्डकपची फायनल त्यांनी खेळली. पुन्हा २००९ आणि २०१२ टी२० वर्ल्डकप फायनलला गेले. पाच वर्षात चार फायनल खेळूनही त्यांना वर्ल्डकप जिंकता आला नव्हता. अखेर २०१४ ला त्यांनी सारी कसर भरून काढली आणि टी२० वर्ल्डकप जिंकलाच. तब्बल १८ वर्षांनंतर वर्ल्डकप श्रीलंकेत आलेला. मलिंगा आणि संगकाराला घेऊन त्यांनी २०१५ वनडे वर्ल्ड कप खेळला आणि गाडी क्वार्टर फायनलला थांबली. बस येथूनच श्रीलंका क्रिकेटचे दिवस फिरले.

खेळाडू आणि बोर्डात वाद सुरू झाले. मुद्दा होता पैशाचा. माघार कोणीच घेईना. चर्चांचे धुरळे उडाले, पण मधला मार्ग काही सापडेना. खेळाडू म्हणू लागले आम्ही फक्त देशप्रेम म्हणून खेळतो. कारण, त्यांना मानधन असेही मिळतच नव्हते. बोर्डाकडून काही सपोर्ट नव्हताच मग प्लेअर्सनीही मनमानी कारभार सुरू केला. त्यांना वाटेल, तेव्हा ते म्हणायचे आम्ही खेळायला अवेलेबल आहेत, तर सरळ कधीकधी इंजुरीच कारण सांगून बोर्डाला कात्रीत पकडायचे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तर काय चाललंय हे कोणाला माहीत नसायचे? नवे प्लेयर्स पुढे यायचे तेही वशिला लावून. मागच्या चार वर्षात श्रीलंकन क्रिकेटने, तर नवाच पायंडा पाडलाय. कधी कधी असे दिसते की ते दर सिरीजला नवा कॅप्टन आणतायेत. पुन्हा फिटनेस टेस्ट आणि ॲन्युअल कॉन्ट्रॅक्टचा राडा झाला आणि श्रीलंका क्रिकेटची अक्षरशः वाट लागली.

एवढं सारं घडत असताना रिटायर झालेले श्रीलंकन क्रिकेटचे हिरो मात्र पैसे कमावत बसले. संगकारा, जयवर्धने, मलिंगा आयपीएलमध्ये कोचिंग करू लागले. आपल्या द्रविड-लक्ष्मणचा आदर्श घेऊन पैशाला दुय्यम स्थान देत, देशाच्या क्रिकेटला पुढे घेऊन जाण्याचा विचार त्यांनी केला असता, तर कदाचित आज चित्र वेगळे असते.

आज श्रीलंकेत जी राजकीय अनागोंदी माजलीये त्यातून फक्त आणि फक्त क्रिकेटच त्यांना सावरू शकते. काय माहित या आंदोलनातून एखादा क्रिकेटर नेता श्रीलंकेला लाभेल. पुढे देश चालवेल आणि श्रीलंका क्रिकेटही सावरेल.

क्रिकेटच पुनर्जीवन झालं की श्रीलंकेत सारं काही आलबेल होऊ शकतं | What’s happening in Sri Lanka?

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

ज्या दाऊदला पाहून सर्वांची टरकते, त्याला कपिल पाजींनी शिकवलेला चांगलाच धडा, काय होता तो किस्सा?

फ्लॉप क्रिकेटर्सच्या भाऊगर्दीत आकाश चोप्रानं स्वत:चं करिअर सोन्याच्या नाण्याप्रमाणं खणकवलंय, कसं ते वाचा

भारतरत्न! ‘हे’ ४ भारतीय खेळाडू होऊ शकतात देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---