माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम (Sabaa Kareem) यांच्या मते, वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) आता भारतीय संघात सामील करण्याची वेळ आली आहे. 14 वर्षांचा हा डावखुरा फलंदाज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अंडर-19 वर्ल्ड कप 2026 च्या गेल्या तीन सामन्यांत वैभवने 72, 40 आणि 52 धावांच्या खेळी केल्या आहेत. त्याच्या कामगिरीवर सबा करीम ‘IANS’ शी बोलताना म्हणाले, तो खूप प्रतिभावान आहे. त्याला खेळताना पाहून मला खूप आनंद झाला. मला वाटते की आता त्याला भारतीय संघात घेण्याची वेळ आली आहे.
ते पुढे म्हणाले, हे चांगली गोष्ट आहे की वैभववर लक्ष ठेवले जात आहे. स्टेट असोसिएशन आणि बीसीसीआयचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ आपले काम करत आहेत. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघ देखील त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. लवकरच असा काळ येईल जेव्हा आपण त्याला भारतीय संघात खेळताना पाहू.
वैभव आयपीएलमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याने अवघ्या 14 वर्षे 32 दिवस वयात हा पराक्रम केला होता. आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध केवळ 35 चेंडूत शतक ठोकले होते. ख्रिस गेलनंतर (30 चेंडू) हे आयपीएल इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक आहे.
(T-20 international world cup 2026) भारत आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपबद्दल सबा करीम म्हणाले, भारतीय संघ टी-20 फॉरमॅटमध्ये खूप मजबूत आहे आणि उत्तम कामगिरी करत आहे. मला वाटते की, आपण हा वर्ल्ड कप अगदी आरामात जिंकू. आपली टीम ‘व्हाईट बॉल’ क्रिकेटमध्ये शानदार आहे, मात्र कसोटी क्रिकेटमध्ये थोडी मेहनत घ्यावी लागेल.






