रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पण, हिटमॅनने अजूनही वनडे फॉरमॅटमधील त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द सुरू ठेवायचे ठरवले आहे. रोहित किती काळ 50 षटकाच्या क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजी आणि कर्णधारपदाने टीम इंडियाचे नेतृत्व करेल, हे सांगणं सध्या अवघड आहे.
रोहितने दोन फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वनडेमध्येही टीम इंडियाच्या पुढच्या कर्णधाराच्या नावावर चर्चा सुरू झाली आहे.
रोहितनंतर वनडेमध्ये कर्णधारपदासाठी सगळ्यात पुढे शुबमन गिलचे (Shubman gill) नाव आहे. गिलला कसोटी संघाची कमान आधीच सोपवण्यात आली आहे आणि इंग्लंडमध्ये आपल्या नेतृत्वातून त्याने छापही पाडली आहे.
दुसरे नाव श्रेयस अय्यरचे (Shreyas iyer) आहे. अय्यरने गेल्या काही काळात आपल्या फलंदाजी आणि कर्णधारपदाच्या कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. असे मानले जाते की, निवडकर्ते हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya) नावावरही विचार करू शकतात. केएल राहुलसुद्धा (KL Rahul) वनडेमध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे.






