इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे झालेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025च्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभव पत्करावा लागला. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी या सामन्यात पाच फलंदाजांनी शतकी खेळी करुनही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला, तर इंग्लंडने फक्त दोन शतकांच्या जोरावर सामना जिंकला. मालिकेत भारत आता 0-1 ने पिछाडीवर आहे. या बातमीद्वारे भारताच्या पराभवामागची पाच मोठी कारणे पाहुया.
सर्वात पहिले कारण म्हणजे शेवटच्या फळीतले फलंदाज म्हणजेच टेलएंडर्स अपयशी ठरले. पहिल्या डावात शेवटचे 6 गडी 41 धावांत आणि दुसऱ्या डावात 31 धावांत गमावले गेले. पण दुसरीकडे इंग्लंडच्या शेवटच्या फलंदाजांनी मात्र महत्त्वपूर्ण धावा केल्या.
दुसरं कारण होतं साई सुदर्शनचं अपयशी पदार्पण. पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला आणि दुसऱ्या डावात 30 धावांपर्यंत मजल मारली. त्याशिवाय एक झेल सोडणं आणि चुकीचं DRS घेणंही त्याच्या खात्यात गेलं.
तिसरं कारण म्हणजे करुण नायरचं फिकट पुनरागमन. सात वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करताना तो पहिल्या डावात शून्यावर आणि दुसऱ्या डावात फक्त 20 धावा करून माघारी परतला. कारण त्याच्याकडून संघाला मोठी अपेक्षा होती.
चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे खराब फील्डिंग. भारताने संपूर्ण सामन्यात तब्बल 9 झेल सोडले आणि एका नो-बॉलमुळे मिळालेला बळीही गमावला. या चुका संघाला चांगल्या फलंदाजांविरुद्ध महागात पडल्या.
शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं कारण होतं कमकुवत गोलंदाजी. बुमराहने पहिल्या डावात प्रभाव टाकला, पण बाकीच्या गोलंदाजांनी निराशा केली. एकूण सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने 5 विकेट्स घेतल्या पण त्याचा इकॉनॉमी रेट जास्त होता. सिराज आणि शार्दूलला फक्त 2-2 विकेट्स मिळाल्या, तर जडेजाला केवळ एकच विकेट मिळाली.
या सर्व कारणांमुळे भारताला सामना गमवावा लागला. आता उर्वरित मालिकेत विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला सर्वच विभागात सुधारणा करावी लागणार आहे.






