दुसऱ्या टी20 मध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडिया धर्मशाळेत जोरदार पलटवार करण्यासाठी सज्ज झाली आहे. मालिकेतील तिसरा आणि महत्त्वाचा सामना 14 डिसेंबरला खेळला जाणार आहे. मुल्लांपूरमध्ये भारतीय संघासाठी काहीही योग्य घडले नव्हते. गोलंदाजांनी मनसोक्त धावा दिल्या होत्या, तर फलंदाजी क्रम देखील कोसळला होता.
पहिल्या दोन टी20 सामन्यांमध्ये संघाचा टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरला आहे. अशा परिस्थितीत, तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्याचा विचार करू शकतो.
शुबमन गिलला सतत संधी मिळत आहेत, पण तो आतापर्यंत बॅटने काही खास कमाल दाखवू शकलेला नाही. मालिकेतील दोन सामन्यांमध्ये गिलने एकूण 4 धावा केल्या आहेत. आता तिसऱ्या टी20 मध्ये शुबमनला बेंचवर बसवण्याचा विचार टीम मॅनेजमेंट करू शकते.
गिलच्या जागी सलामीवीर म्हणून संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते, जो पहिल्या दोन सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होता. या फॉर्मेटमध्ये सलामीवीर म्हणून संजूचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे.
दुसरीकडे, गिल सातत्याने संघर्ष करताना दिसत आहे. यावर्षी गिल एकही अर्धशतक झळकावू शकलेला नाही.
दुसऱ्या टी20 मध्ये जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांची जोरदार धुलाई झाली होती. अर्शदीपने 4 षटकांत 54 धावा दिल्या होत्या, तर बुमराहने 45 धावा खर्च केल्या होत्या. अशा परिस्थितीत, तिसऱ्या टी20 सामन्यात हर्षित राणाला संधी मिळू शकते. हर्षित गोलंदाजीसोबतच चांगली फलंदाजीही करू शकतो.





