विराट कोहलीचे सर्व काही ठीक नाही. एकीकडे तो फॉर्मशी झुंजत आहे, तर दुसरीकडे दुखापतीने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. कंबरेच्या दुखापतीमुळे कोहलीला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेला मुकावे लागले आणि आता दुसऱ्या वनडेतही तो बाहेर जाण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या दुखापतीत सुधारणा झालेली नाही. अशा स्थितीत तो लॉर्ड्सवरील दुसऱ्या वनडेत खेळू शकणार नाही. बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात क्षेत्ररक्षण करताना कोहलीला दुखापत झाली.
केनिंग्टन ओव्हल येथे झालेल्या पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. मात्र, श्रेयसला फलंदाजीची संधी मिळाली नाही, कारण रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने पहिल्या विकेटसाठी नाबाद १४१ धावांची भर घालून विजयाचे लक्ष्य गाठले. पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर असूनही कोहली संघासह केनिंग्टन ओव्हलमध्ये आला आणि ड्रेसिंग रूममध्ये बसलेला दिसला. पण, त्याने सरावात भाग घेतला नाही. विराट दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळणार याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट जारी करण्यात आलेले नाही.
कोहलीला फॉर्म परत मिळवण्याची संधी होती
कोहलीची दुखापत अशा वेळी झाली आहे जेव्हा तो खराब फॉर्मशी झुंज देत आहे आणि संघातील त्याच्या स्थानावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता तो दुसऱ्या वनडेतूनही बाहेर असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत टी२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी त्याचे फार कमी सामने शिल्लक आहेत. इंग्लंडनंतर भारताला वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात भारताला वनडेसह टी२० मालिका खेळायची आहे. विराटला वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्याने टी२० मालिकेतून विश्रांतीही मागितली होती. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. जर त्याला टी२० मालिकेतही विश्रांती दिली गेली, तर तो थेट आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ टी०२ मालिकेत खेळू शकतो.
अशा परिस्थितीत कोहलीला टी२० विश्वचषकापूर्वी फॉर्ममध्ये परतण्यासाठी फारच कमी सामने असतील. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला फॉर्ममध्ये परतण्याची चांगली संधी होती. पण, आता तेही हाताबाहेर जात असल्याचे दिसून येत आहे.
वनडेत कोहलीची कामगिरी चांगली आहे
कोहली टी२० आणि कसोटीत संघर्ष करत असल्याचे दिसत आहे. पण, वनडेत त्याचा फॉर्म तितकासा खराब नाही. एकदिवसीय सामन्यांच्या शेवटच्या ६ डावांमध्ये त्याने २ अर्धशतके झळकावली आहेत. अशा स्थितीत, तो एकदिवसीय सामन्यांद्वारे आपला गमावलेला फॉर्म परत मिळवू शकतो, कारण त्याला या फॉरमॅटमध्ये आपली लय परत मिळविण्यासाठी वेळ मिळणार आहे. मात्र, दुखापतीमुळे ही आशाही धुळीस मिळताना दिसत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
युवराज नाही तर रोहितच खरा सिक्सर किंग! एकदिवसीय सामन्यात लगावलेत तब्बल ‘एवढे’ सिक्स
इंग्लंडचा धुव्वा उडवत रोहित-शिखरने गाठलं आकाश, सचिन-गांगुलीच्या विश्वविक्रमापासून फक्त एक पाऊल दूर
निर्विवाद वर्चस्व! पहिल्या वनडेत भारताचा इंग्लंडवर एकतर्फी विजय; बुमराह, रोहित ठरले मॅच विनर