भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने पुन्हा एकदा पाकिस्तानी गोलंदाजांच्या नाकी नऊ आणल्या. त्याने आशिया चषक 2023 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून 140 कोटींहून अधिक भारतीयांची मने जिंकली. विराटने पाकिस्तानविरुद्ध नाबाद 122 धावांची वादळी शतकी खेळी साकारत विक्रमांचा पाऊसही पाडला. या सामन्यात त्याने केएल राहुल याच्यासोबत नाबाद 233 धावांची भागीदारी साकारली. या दोघांमुळे भारताला 356 धावांचा डोंगर उभारता आला. यानंतर पाकिस्तान संघाने फलंदाजी करताना 128 धावांवरच नांग्या टाकल्या. यावेळी कुलदीप यादव 5 विकेट्स घेण्यात यशस्वी झाला. अशात सामन्यातनंतर विराटने दिलेली प्रतिक्रिया सर्वांची मने जिंकत आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याने सामन्यात नाबाद 122 धावांची शतकी खेळी साकारली. हे त्याचे वनडे कारकीर्दीतील 47वे शतक होते. या सामन्यानंतर त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी बोलताना त्याच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले.
काय म्हणाला विराट?
विराट कोहली याने (Virat Kohli Statement) रणनीतीबद्दल खुलासा करत म्हटले, “मी तुम्हाला म्हणणार होतो की, मुलाखत थोडी छोटी ठेवा, मी खूपच दमलो आहे. मी नेहमीच संघाला वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्यासाठी तयार अशतो. केएल राहुलने चांगली सुरुवात केली आणि माझे काम फक्त स्ट्राईक रोटेट करणे होते. जेव्हा मी एक-एक धाव घेतो, त्याचा मला अभिमान वाटतो. मी आणि केएल दोघेही पारंपरिक क्रिकेटपटू आहोत. आम्ही फॅन्सी गोष्टी करत नाहीत. मात्र, आम्ही चांगल्या क्रिकेट शॉट्सने बऱ्याच धावाही करतो. चांगली भागीदारी भारतीय क्रिकेटसाठी चांगला संकेत आहे. त्याने ज्याप्रकारे पुनरागमन केले, ते शानदार होते. मी एक-एक धाव घेण्यासाठी पुश करत होतो आणि मी यासाठी खूपच खुश आहे.”
श्रीलंकेविरुद्ध खेळणार का?
विराटने पुढे म्हटले, “परंतु मी सतत याबाबत विचार करतो की, मला उद्याही 3 वाजता खेळायचे आहे. आम्ही सर्व कसोटी क्रिकेटपटू आहोत. मी 100हून अधिक कसोटी सामने खेळलो आहे. त्यामुळे मला माहिती आहे की, दुसऱ्या दिवशी कसे खेळायचे आहे. वातावरण खूपच दमट होते आणि मी येत्या नोव्हेंबर महिन्यात 35 वर्षांचा होणार आहे. त्यामुळे मला त्याचीही काळजी असेल. ग्राऊंड्स स्टाफना धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांच्यामुळेच हा सामना होऊ शकला. ”
भारताचा पुढील सामना
भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध 228 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यानंतर भारताला आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीचा चौथा सामना श्रीलंका संघाविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना 12 नोव्हेंबर रोजी आर प्रेमदासा स्टेडिअमवरच खेळला जाणार आहे. या सामन्यातही विराट कोहलीच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष असणार आहे. (will virat kohli play against sri lanka after hitting 122 against pakistan know here)
हेही वाचा-
रोहितही बनला ‘किंग’ कोहलीचा फॅन; सामन्यानंतर कौतुक करताना थकला नाही कॅप्टन, म्हणाला, ‘विराटची खेळी…’
भारतासाठी 956 विकेट्स घेणाऱ्या अनिल कुंबळेला करावा लागला बसने प्रवास, पण का आली अशी वेळ?