विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमधील साउथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी आमनेसामने असतील. या सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंडला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभूत केल्याने भारतीय संघाची चिंता वाढली आहे.
आता याच चिंतेत भर टाकणारी एक बातमी समोर येत आहे. साउथम्पटनच्या खेळपट्टीच्या स्वरूपाबाबत माहिती समोर आली असून ही खेळपट्टी भारताला काहीशी प्रतिकूल ठरण्याची शक्यता आहे. त्याचवेळी न्यूझीलंडने अशाच प्रकारच्या खेळपट्टीवर नुकतेच इंग्लंडला पराभूत केल्याने त्यांना ही खेळपट्टी फायदेशीर ठरू शकते.
गती आणि उसळी असलेली खेळपट्टी
साउथम्पटनच्या मैदानातील खेळपट्टीचे क्युरेटर सिमोन ली यांनी एका क्रीडा संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत खेळपट्टीच्या स्वरूपाबाबत सविस्तर भाष्य केले. त्यांनी ही खेळपट्टी उत्तम गती आणि उसळी असणारी असेल, असे यावेळी सांगितले. ते म्हणाले, “माझी वैयक्तिक इच्छा आहे की खेळपट्टीवर उत्तम गती आणि उसळी असायला हवी. खरंतर इंग्लंडमध्ये सध्याच्या काळात पाऊस असल्याने हे साध्य करणे अवघड असते. मात्र सध्या तरी हवामानाचे संकेत चांगले आहेत. त्यामुळे आम्ही हे साध्य करण्यात यशस्वी होऊ, अशी आशा आहे.”
फिरकीपटूंना देखील मिळेल फायदा
पुढे ते म्हणाले, “लाल चेंडू कायमच क्रिकेटची रंगत अजून वाढवतो. मी देखील एक क्रिकेट चाहता आहे आणि त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना प्रत्येक चेंडू पहावासा वाटेल, अशीच खेळपट्टी तयार करण्याचा माझा प्रयत्न आहे. फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये समान लढाई व्हावी, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळेच खेळपट्टीवर गती आणि उसळी असेल. मात्र यामुळे केवळ वेगवान गोलंदाजांनाच नाही तर फिरकीपटूंना देखील शेवटच्या दोन दिवसात फायदा मिळेल. कारण या खेळपट्टीच्या मातीत रेती देखील मिसळली असल्याने ती लवकर कोरडी पडेल. त्यामुळे सगळ्यांनाच खेळपट्टीकडून फायदा मिळेल.”
न्यूझीलंडचे पारडे जड
न्यूझीलंडच्या संघाला मायदेशात देखील वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या आणि गती व उसळी मिळणाऱ्या खेळपट्ट्यांवर सामने खेळण्याची सवय आहे. त्यामुळे साउथम्पटनच्या मैदानावर त्यांचे पारडे काहीसे जड असू शकते. मात्र गेल्या काही वर्षांत भारतीय संघाने अशाच प्रतिकूल परिस्थितीत देखील सामने जिंकले असल्याने ते देखील या सामन्यात खेळपट्टीची पर्वा न करता कडवे आव्हान उभे करतील, यात शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेत्याला मिळणार तब्बल इतकी रक्कम, आयसीसीने केली घोषणा
जेव्हा विराटचे नोटबुक सेलिब्रेशन पाहून खुद्द बिग बी म्हणाले होते, किती वेळा सांगू, त्याला छेडू नकोस
सुशांत सिंग राजपूत म्हणाला होता, धोनी आणि माझी कहानी सारखीच…