सिडनी| गुरुवारपासून(७ जानेवारी) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (८ जानेवारी) या खेळीसह त्याने एक खास विक्रम केला आहे.
या सामन्यात भारताकडून गिल रोहित शर्मासह सलामीला फलंदाजीसाठी उतरला होता. त्याने यावेळी १०१ चेंडूंचा सामना करताना ५० धावांची खेळी केली. या अर्धशतकी खेळीत त्याने ८ चौकार मारले आहेत. हे त्याचे कारकिर्दीतील पाहिले कसोटी अर्धशतक आहे.
त्यामुळे गिल आशिया खंडाबाहेर ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा चौथ्या क्रमांकाचा सर्वात युवा भारतीय सलामीवीर ठरला आहे. त्याने शुक्रवारी जेव्हा अर्धशतक केले तेव्हा त्याचे वय २१ वर्षे १२२ दिवस एव्हढे होते.
आशिया खंडाबाहेर भारताकडून सलामीवीर म्हणून सर्वात कमी वयात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम रवी शास्त्री यांच्या नावावर आहे. त्यांनी १९८२ साली इंग्लंडमध्ये २० वर्षे ४४ दिवस एवढे वय असताना अशी ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली होती.
त्यापाठोपाठ माधव आपटे आणि पृथ्वी शॉ आहे. आपटे यांनी १९५२-५३च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात तब्बल ४ वेळा ५० धावांचा टप्पा पार केला होता. त्यातील पहिल्यांदा जेव्हा त्यांनी ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली तेव्हा ते २० वर्षे १०८ दिवसांचे होते. तर शॉने न्यूझीलंडविरुद्ध २०२० साली २० वर्षे ११२ दिवस एवढे वय असताना अर्धशतकी खेळी केली होती.
आशिया खंडाबाहेर सर्वात कमी वयात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारे भारतीय सलामीवीर –
२० वर्षे ४४ दिवस – रवी शास्त्री (इंग्लंडमध्ये, १९८२)
२० वर्षे १०८ दिवस – माधव आपटे (वेस्ट इंडिज दौरा, १९५२-५३)
२० वर्षे ११२ दिवस – पृथ्वी शॉ (न्यूझीलंडमध्ये, २०१९-२०)
२१ वर्षे १२२ दिवस – शुबमन गिल (ऑस्ट्रेलियामध्ये, २०२०-२१)
ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा भारतीय सलामीवीर –
गिल हा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा सर्वात तरुण भारतीय सलामीवीर देखील ठरला आहे. भारताकडून सलामीवीर म्हणून सर्वात कमी वयात वनडेत ऑस्ट्रेलियात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम रवी शास्त्री यांच्या नावावर आहे. तर टी२०मध्ये हा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे.
शास्त्रींनी ऑस्ट्रेलियात जेव्हा वनडेत ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली होती, तेव्हा ते २२ वर्षांचे होते. तर टी२०मध्ये केएल राहुलने जेव्हा ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली होती. तेव्हा तो २८ वर्षांचा होता.
महत्त्वाच्या बातम्या –
“रिषभ पंतला आपल्या यष्टीरक्षणात सुधारणा करण्याची नितांत गरज”
कॅमरॉन ग्रीनने एकअंगी झुकत पकडला शुबमन गिलचा शानदार झेल, पाहा व्हिडिओ
व्वा रे व्वा! पठ्ठ्याने बर्थडे दिवशी घेतली रोहित शर्माची विकेट अन् घातली मोठ्या विक्रमाला गवसणी