भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत बॉर्डर-गावसकर मालिका २-१ ने जिंकली आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सर्व देशभरातून संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच छत्रपती संभाजीराजे यांनी देखील भारतीय संघाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. संभाजी राजे यांनी ट्विटरवरून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
संभाजीराजे यांनी ट्विट करत लिहिले, “भारताचा ऑस्ट्रेलियावर थरारक विजय… रिषभ पंत, शुभमन गिल, ठाकूर, पुजारा, वॉश्गिंटन सुंदर काय खेळलेत…. अमेझिंग विजय.” संभाजी राजे हे क्रिकेटचे मोठे फॅन असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आलेले आहे. २०१८ साली पुणे येथे भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना झाला होता . तेव्हा संभाजी राजे व भारतीय कर्णधार विराट कोहली यांचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता.
https://twitter.com/YuvrajSambhaji/status/1351436287551688705
भारतीय संघाने ब्रिस्बेन कसोटीत शानदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लॅब्युशेनच्या शतकी खेळीच्या जोरावर ३६९ धावांपर्यंत मजल मारली होती. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात भारताकडून टी नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने शार्दुल ठाकूर (६७) आणि वॉशिंग्टन सुंदर (६२) यांच्या शतकी भागीदारीसह पहिल्या डावात ३३६ धावा केल्या.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २९४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद सिराजने या डावात सर्वाधिक ५ विकेट्स आणि शार्दुल ठाकूरने ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह ३२८ धावांचे आव्हान दिले होते. भारताने ७ विकेट्स गमावत ९७ षटकात या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली खुश! ‘असे’ ट्विट करत केले अभिनंदन
‘मार बसला तरी आपण नेटाने उभा राहिलो’, क्रिकेटच्या देवाकडून संघाचं खास शब्दात कौतुक





