भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना रविवारी कोलंबोच्या आर प्रेमादासा स्टेडियमवर खेळला गेला. जिथे भारताने ३८ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली. सामन्यात चार बळी घेणाऱ्या वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला सामनावीर म्हणून घोषित केले गेले. मात्र, भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी त्याच्या ऐवजी दुसरे खेळाडूला सामनावीर पुरस्कार मिळायला हवा होता अशी इच्छा व्यक्त केली.
या खेळाडूला मिळायला हवा होता सामनावीर पुरस्कार
पहिल्या टी२० सामन्यात चार बळी मिळवून श्रीलंका संघाला पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या भुवनेश्वर कुमार याला सामनावीर म्हणून घोषित केले गेले. मात्र, भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान व प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी या सामन्यात सामनावीर सुर्यकुमार यादव असायला हवा होता असे म्हटले.
एका प्रसिद्ध क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना झहीर म्हणाला, “गोलंदाजाला कामगिरीचे श्रेय मिळाले ही चांगली गोष्ट आहे. मात्र, मला विचाराल तर सामनावीर म्हणून मी सुर्यकुमार यादवची निवड केली असती.”
हर्षा भोगले यांनीदेखील झहीरच्या सुरात सूर मिसळताना म्हटले, “खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी नव्हती. सूर्यकुमारने आकर्षक फटके लगावत सामन्यातील एकमेव अर्धशतक झळकावले. तो सामनावीर पुरस्काराचा हकदार होता.”
भारतीय संघाचे ५१ धावांमध्ये दोन गडी बाद झाले असताना सूर्यकुमारने ३४ चेंडूंमध्ये ५० धावांची आकर्षक खेळी केली. दुसरीकडे भुवनेश्वरने ३.३ षटकात २२ धावा देऊन चार गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.
भारताने मिळवला सोपा विजय
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाने सूर्यकुमार यादव (५०), कर्णधार शिखर धवन (४६) व संजू सॅमसन (२७) यांच्या योगदानाच्या बळावर २० षटकांत पाच गडी गमावून १६४ धावा केल्या. १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ १८.३ षटकांत १२६ धावांत गडगडला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
स्विंमिंगमध्येही भारताच्या पदरी निराशाच! साजन प्रकाश सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयशी
भुवनेश्वर कुमार का खेळत नाही कसोटी क्रिकेट, झाला महत्त्वपूर्ण खुलासा