मुंबई। आज(14 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय भूमीतील भारताचा 10 विकेट्सने झालेला हा वनडेतील दुसरा पराभव आहे. याआधी 2005मध्ये भारतीय संघाला कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेने 10 विकेट्सने पराभूत केले होते.
तसेच वनडेतील भारताचा हा 10 विकेट्सने झालेला एकूण 5 वा पराभव आहे. भारताने 1981 मध्ये पहिल्यांदा न्यूझीलंडविरुद्ध मेलबर्न येथे 10 विकेट्सने पराभव स्विकारला होता. त्यानंतर 1997मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध ब्रिजटाऊन येथे तर 2000मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शारजा येथे भारताने 10 विकेट्सने वनडेत पराभव स्विकारला आहे.
आज मुंबईत पार पडलेल्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.1 षटकात सर्वबाद 255 धावा केल्या होत्या. भारताकडून शिखर धवनने 91 चेंडूत 74 धावा केल्या. तसेच त्याला केएल राहुलने चांगली साथ देताना 47 धावांची खेळी केली.
त्यानंतर 256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि ऍरॉन फिंचने नाबाद 258 धावांची भागीदारी करत सहज ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
वनडेत भारताला 10 विकेट्सने पराभव स्विकारावा लागलेले सामने –
विरुद्ध न्यूझीलंड, मेलबर्न – 1981
विरुद्ध वेस्ट इंडिज, ब्रिजटाऊन – 1997
विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजा – 2000
विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता – 2005
विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मुंबई – 2020






