भारताचा कर्णधार विराट कोहलीने आजपर्यंत मोठे यश मिळवले आहे. त्याने गेल्या 13 वर्षात संघातील एक युवा खेळाडू ते भारताचा कर्णधार असा मोठा प्रवास केला आहे. पण विराट सर्वात आधी प्रकाशझोतात आला ते 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकानंतर. बरोबर 13 वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषक विजयाचे स्वप्न पूर्ण केले होते. तसेच भारताला दुसऱ्यांदा 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकून दिला होता.
साल 2008 ला झालेल्या या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारताचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध झाला होता. या सामन्यात भारताने डकवर्थ लूईस नियमाप्रमाणे 12 धावांनी विजय मिळवला होता. या विश्वचषकात भारताकडून खेळलेल्या काही खेळाडूंनी भारताच्या वरिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व केले. तर काहींनी क्रिकेट व्यतिरिक्त अन्य क्षेत्रांचा मार्ग निवडला.
साल 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळलेले खेळाडू सध्या काय करतात, वाचा-
विराट कोहली- 19 वर्षांखालील भारतीय संघातून सुरु झालेला विराटचा प्रवास आज भारताच्या वरिष्ठ संघाचा कर्णधार इथपर्यंत झाला. तो क्रिकेट जगतात सध्याचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून ओळखला जोतो. तसेच त्याने अनेक मोठे विश्वविक्रमही आपल्या नावावर केले आहेत.
त्याने आत्तापर्यंत 251 वनडे, 85 टी20 आणि 90 कसोटी सामने भारताकडून खेळले आहेत. तसेच तो 2011 च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचाही भाग होता. त्याला डिसेंबर 2014 मध्ये भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यास आले. तर जानेवारी 2017मध्ये तो भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघाचाही नियमित कर्णधार झाला.
रविंद्र जडेजा – साल 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाचा उपकर्णधार असणाऱ्या रविंद्र जडेजानेही वरिष्ठ भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. तो सध्या भारताच्या कसोटी संघाचा नियमित सदस्य असून त्याने आत्तापर्यंत 51 कसोटी, 168 वनडे आणि 50 टी20 सामने खेळले.
त्याने साल 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीनंतर 2009 ला त्याला श्रीलंका दौऱ्यात भारताच्या वरिष्ठ संघाकडून पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली होती.
तसेच जडेजा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात लायन्स, कोची टकर्स केरला आणि राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला आहे.
अजितेश अरगल – अजितेश हा साल 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरला होता. त्याने अंतिम सामन्यात पाच षटकात 7 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र आता तो क्रिकेट खेळत नाही.
त्याने या विश्वचषकानंतर तो केवळ 19 सामने बडोदाकडून खेळला. त्याने क्रिकेटपेक्षा शिक्षणाला प्राधान्य दिले. तो सध्या बडोदामध्ये आयकर विभाग निरीक्षक आहे.
नेपोलियन आइनस्टाईन – नावामुळे प्रसिद्ध झालेल्या नेपोलियनला 2008 मध्ये विश्वचषकानंतर चेन्नई सुपस किंग्जने आयपीएलच्या पहिल्या मोसमासाठी संघात घेतले होते. पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तो शेवटचे 2014 मध्ये तमिळनाडूकडून सईद मुश्ताकअली टी20 ट्रॉफी खेळताना दिसला होता.
मात्र त्याच्याबद्दल आणखी माहिती उपलब्ध नाही. पण काही रिपोर्टनुसार तो आता प्रोफेशनल क्रिकेट खेळत नाही.
श्रीवत्स गोस्वामी – यष्टीरक्षक फलंदाज असलेला श्रीवत्स गोस्वामीला वरिष्ठ भारतीय संघात जागा मिळालेली नाही. पण त्याने त्या विश्वचषकात 152 धावा केल्या होत्या. त्याने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैद्राबाद संघाने प्रतिनिधित्व केले आहे.
तसेच तो सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाकडून खेळत असून त्याची कामगिरीही चांगली झाली आहे. 2019-20 च्या रणजी मोसमात उपविजेत्या ठरलेल्या बंगाल संघाचाही तो भाग होता. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 55 प्रथम श्रेणीचे तर 88 अ दर्जाचे सामने खेळले आहेत.
पेरी गोयल – साल 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात पेरी गोयलला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. या विश्वचषकानंतरही पेरी गोयलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकही सामना खेळला नाही.
यष्टीरक्षक फलंदाज असणाऱ्या गोयलने या स्पर्धेनंतर मॅनेजमेंटमध्ये करियर करण्यासाठी क्रिकेट खेळणे सोडले. तो सध्या पटीयालामधील आरएसजी प्रोपर्टीज नावाच्या कंपनीमध्ये संचालक आहे.
इक्बाल अबदुल्ला – इक्बालने या विश्वचषकात 13 च्या सरासरीने 10 विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळला. साल 2007 ला त्याने मुंबईकडून खेळताना केल्या शानदार कामगिरीमुळे 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवले होते.
साल 2010 मध्येही त्याने मुंबईकडून 27 विकेट्स घेत प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने संघात घेतले. त्याने 2011 मध्ये आयपीएलमध्ये 2 सामनावीर पुरस्कार जिंकताना उदयोन्मुख खेळाडूचाही पुरस्कार मिळवला. त्याच्या पुढच्याच मोसमात तो आयपीएल विजेत्या कोलकाता संघाचा भाग होता.
पण त्यानंतर त्याची कामगिरी खराब झाल्याने त्याला कोलकाताने काढून टाकले. साल 2014मध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला. त्यानंतर तो 2 मोसम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला.
यादरम्यान मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत असताना त्याची कामगिरीही खालावली. अखेर तो मुंबई संघातून बाहेर पडला. साल 2016 मध्ये तो केरळ संघाकडे गेला. पण पुन्हा साल 2018मध्ये तो मुंबई संघात परतला. मात्र त्याला रणजी ट्रॉफीसाठी मुंबईच्या संभाव्य संघातही संधी न मिळाली नाही. अखेर 2019-20 मोसमात तो सिक्कीमकडून खेळला. तसेच आता तो सिक्कीमकडूनच क्रिकेट खेळत आहे.
सिद्धार्थ कौल – मध्यमगती गोलंदाज असणाऱ्या सिद्धार्थ कौलने या विश्वचषकात 5 सामन्यात 10 विकेट्स घेत प्रभावी कामगिरी केली होती. पण त्यानंतर झालेल्या दुखापतीमुळे तो काही दिवस क्रिकेटपासून दूर रहावे लागले.
पण तो पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळताना चांगली कामगिरी करत असल्याने साल 2013 आणि 2014 च्या आयपीएल मोसमात दिल्ली डेअरडेविल्सने त्याला संधी दिली. नंतर साल 2016मध्ये त्याला सनरायझर्स हैद्राबादने संघात घेतले आणि त्याच्या कारकिर्दीला वळण मिळाले.
सन 2018मध्ये तो हैद्राबादकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक 21 विकेट्स घेणारा गोलंदाज होता. त्याचवर्षी त्याला भारताच्या वरिष्ठ संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचीही संधी मिळाली. त्याने भारताकडून 3 वनडे आणि 3 टी20 सामने खेळले आहेत. तसेच तो सध्या पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेटही खेळत आहे.
तरुवार कोहली – पंजाबचा असणाऱ्या तरुवार कोहलीने या विश्वचषकात सगल 3 अर्धशतके करत 43.60 च्या सरासरीने 218 धावा केल्या होत्या. या विश्वचषकानंतर तरुवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला. त्यानंतर तो 2009 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला.
तसेच त्याने पंजाबकडून खेळताना 2012-13 च्या मोसमात रणजी ट्रॉफीमध्ये झारखंड विरुद्ध त्रिशतकही केले होते. पण नंतर कामगिरीत सातत्याने खराब होत असल्याने त्याला पंजाब संघातून वगळण्यात आले. तो 2018-19 च्या मोसमात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मिझोरम संघाकडून खेळला. सध्या तो देशांतर्गत क्रिकेट मिझोरमकडूून खेळत आहे.
अभिनव मुकुंद – अभिनवला 19 वर्षांखालील विश्वचषकात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतू त्याने तमिळनाडू संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्याला भारताच्या वरिष्ठ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती.
त्याला सन 2011 मध्ये इंग्लंड आणि विंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात संधी मिळाली होती. पण तो या दौऱ्यात अपयशी ठरल्याने त्याला संघातून वगळण्यात आले. साल 2017 मध्ये त्याला पुन्हा भारतीय संघाकडून संधी देण्यात आली होती. पण पुन्हा नंतर त्याला वगळण्यात आले.
तसेच अभिनव हा तमिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत असून त्याने दक्षिण विभाग, भारत अ आणि शेष भारत संघाकडूनही खेळला आहे. तो तमिळनाडूकडून 100 रणजी सामनेही खेळण्याचा कारनामा केला असून तो तमिळनाडूकडून 7000 धावा करण्याराही पहिला फलंदाज आहे.
मनिष पांडे – मनिषसाठी 2008 चा विश्वचषक जरी चांगला ठरला नसला तरी त्याला भारताकडून 26 वनडे आणि 39 टी20 सामने खेळण्याची संधी मिळाली.
तसेच त्याने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली. तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सनरायझर्स हैद्राबाद, कोलकता नाईट रायडर्स, पुणे वॉरियर्स, कोलकता नाईट रायडर्स संघाकडून खेळला आहे. त्याचबरोबर तो आयपीएलमध्ये शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.
त्याने कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली कर्नाटकने देशांतर्गत स्पर्धेंचे विजेतेपदही मिळवले. त्याने 2015 मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. पण 2-3 वर्षे तो भारतीय संघाच्या आत-बाहेर करत राहिला. पण आता तो भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघात नियमित दिसून येतो.
प्रदिप सांगवान – साल 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात एका सामन्यात 5 विकेट्स घेणारा प्रदिप सध्या दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. तो कोलकाता नाईट रायडर्सकडून 6 मोसमात खेळला.
त्याला सन 2013 मध्ये ड्रग्स घेतल्याचे बीसीसीआयच्या डोप टेस्टमध्ये लक्षात आल्याने त्याच्यावर दिडवर्ष बंदी घालण्यात आली होती. पण त्यानंतर 2015मध्ये त्याने यशस्वी पुनरागम केले. त्याने 2015मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये 32 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर त्याला गुजरात लायन्स संघाकडूनही खेळला. नंतर त्याला मुंबई इंडियन्सनेही दीड कोटी किंमत मोजत संघात घेतले होते. परंतू 2020 आयपीएलनंतर मात्र त्याला कोणी खरेदी केले नाही.
दुवारापू शिवा कुमार – अष्टपैलू असणाऱ्या दुवारापूला 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचकात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पण त्याने आंध्रप्रदेश संघात देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी स्थान मिळवले. त्याने आंध्रप्रदेशकडून खेळताना चांगली कामगिरीही केली.
त्याने 42 प्रथम श्रेणी सामन्यात 133 विकेट्स आणि 1061 धावा केल्या आहेत. तसेच 30 अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 40 सामने खेळले असून 45 विकेट्स आणि 522 धावा केल्या आहेत.
पण त्याच्या चांगल्या कामगिरीनंतरही तो भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. तसेच 2018नंतर तो काही शारिरिक समस्यांमुळे क्रिकेटपासून सध्या दूर आहे.
तन्मय श्रीवत्स – साल 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात त्याने 262 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. मात्र त्याची अशी कामगिरी त्याच्या पुढील कारकिर्दीत न झाल्याने त्याला मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळाली नाही.
तो आयपीएलमध्येही किंग्स इलेव्हन पंजाब, कोची टकर्स केरला आणि डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळला. पण त्याला प्रभाव पाडला आला नाही.
तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश संघाकडून खेळत होता. मात्र 2018मध्ये त्याला संघातून वगळण्यात आले. 2019 ला त्याने उत्तराखंडकडून खेळण्यास सुरुवात केली. तिथे त्याला यश मिळाले पण त्याच्या पुढच्याच मोसमात त्याच्याऐवजी उन्मुक्त चंदला उत्तराखंडचा कर्णधार करण्यात आले.
सौरभ तिवारी – सौरभला भारताच्या वरिष्ठ संघाकडून 3 वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याने कमी वयातच झारखंड संघात संधी मिळत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने 19 वर्षांखालील विश्वचषकात 2 अर्धशतके केली होती. तसेच त्याला 2008 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने संघात घेत आयपीएलमध्ये संधी दिली होती.
तसेच 2010 सालामध्ये त्याला 23 वर्षांखालील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला होता. त्याचवर्षी त्याने भारताच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले. पण 3 सामने खेळल्याने त्याला पुन्हा भारतीय संघात संधी मिळाली नाही. तो 2010च्या आशिया चषषकात भारतीय संघाचा भाग होता, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
त्याने आयपीएलमध्येही अनेक संघांचे प्रतिनिधित्व केले. पण 2017मध्ये त्याला कोणीही खरेदी केले नाही. पण 2019-20 च्या मोसमात त्याने झारखंडचे नेतृत्व करताना विजय हजारे ट्रॉफीमध्ये केलेल्या शानदार कामगिरीमुळे त्याला मुंबई इंडियन्सने आयपीएल 2020 मोसमासाठी संघात सामील करुन घेतले. तिवारी सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंडकडून खेळतो.
ट्रेंडिंग घडामोडी –