आयपीएलमध्ये असलेल्या अनेक फ्रँचायझींमध्ये चेन्नई सुपर किंग्ज सातत्याने आयपीएल खेळत आहे. याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे चेन्नई संघ हा मुंबई इंडियन्सनंतर सर्वाधिक वेळा आयपीएलचा चषक (३ वेळा) उंचावणारा संघ आहे. परंतु, २०२० म्हणजे या चालू हंगामात चेन्नईकडे पाहिल्यास अनेकांना हा तोच विजेता संघ आहे का? असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे, आता संघाची सुमार कामगिरी पाहून चेन्नई संघाचे व्यवस्थापन मंडळ देखील हादरले असल्याचे बोलले जात आहे.
सीएसकेची सुमार कामगिरी आणि व्यवस्थापन मंडळाची नाराजी…
चेन्नईचा संघ हा आयपीएलमध्ये असलेल्या इतर संघांपेक्षा समतोल संघ मानला जातो. याचे कारण, संघात असलेल्या जुन्या अनुभवी खेळाडूंचा भरणा आणि युवा खेळाडूंचा समावेश. तसेच, संघात प्रत्येक टप्प्यावर खेळण्यासाठी उपलब्ध असलेले अनेक कौशल्यपूर्ण खेळाडू. मात्र, असे असूनही चेन्नई संघाने आजवर (१३ व्या हंगामात) अपेक्षांची किंचितही पूर्तता न करता, कित्येक पटीने सुमार कामगिरी केलेली आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन संघाच्या प्रदर्शनावर प्रचंड नाराज आहे. तसेच, लवकरच व्यवस्थापन सदस्यांकडून काही खेळाडूंना डच्चू देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे.
संघ प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगचा खेळाडूंना मोठा इशारा…
आयपीएलच्या १३ व्या हंगामात आतापर्यंत चेन्नईने १० सामने खेळले आहेत. ज्यात त्यांना अवघ्या तीन सामन्यात विजय प्राप्त झाला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच चेन्नईचा संघ गुणतालिकेच्या तळाशी आहे. ही बाब संघ व्यवस्थापकांच्या जिव्हारी लागलेली दिसत आहे.
चेन्नई संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफम फ्लेमिंग यांनी, ‘संघात आता दम राहिला नसून वयस्कर खेळाडूंसह मैदानावर तग धरणे अवघड जात असल्याचे’ म्हटले होते. त्यामुळे हा संघातील काही निवडक खेळाडूंसाठी इशारा मानला जात आहे.
संघात दिग्गजांचा भरणा तरीही लाजीरवाणी कामगिरी…
चेन्नई संघातील खेळाडूंची नावे पाहता, हा संघ मैदानावर कोणालाही सहज पाणी पाजेल असे वाटते. एमएस धोनीसारखा जगातील एक दिग्गज खेळाडू आणि भारतीय संघाचा माजी यशस्वी कर्णधार या संघाचे पहिल्यापासूनच नेतृत्त्व करत आहे. ज्याच्या नेतृत्त्वात चेन्नईने तीनदा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे.
तसेच, संघात शेन वॉटसन, फॉफ डुप्लेसिस, अंबाती रायडू, केदार जाधव सारखे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. मात्र, असे असले तरीही या सर्वच खेळाडूंनी आतापर्यंत आयपीएलच्या १३ व्या हंगामात आपल्या खेळातून एकप्रकारे संघाला धोका दिल्याचे दिसत आहे. एखादा अपवाद वगळल्यास हे सर्वच खेळाडू संघाला विजय प्राप्त करुन देण्यात अपयशी ठरलेले दिसतात. हीच परिस्थिती काही प्रमाणात संघातील नव्या युवा खेळाडूंच्या बाबत देखील आहे.
संघ व्यवस्थापन करणार काही खेळाडूंची हाकालपट्टी ?
कोट्यवधी रुपये बोली लावून संघात घेतलेले खेळाडू संघाला पराभूत होण्याचे कारण होत असल्याचे पाहून चेन्नई संघाचे व्यवस्थापक मंडळ आता चांगलेच जागे झाले आहे. एकीकडे संघातील खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर समाजमाध्यमातून टीकेची झोड उठत असताना, संघ व्यवस्थापन देखील आता त्यांना संघाबाहेर करणार असल्याचे सांगितले जात आहे.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखालीच चेन्नई संघाने तीनदा आयपीएल विजेतपद पटकावले असले, तरीही त्याच्या नेतृत्त्वावर देखील आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे लवकरच किंवा पुढील हंगामात व्यवस्थापक मंडळ चेन्नई संघात नेतृत्व बदल करु शकते.
केदार जाधव आणि त्याची कामगिरी हा सध्या चेन्नई संघाचा डोकेदुखीचा विषय बनला आहे. त्याची सातत्याने होणारी निराशाजनक कामगिरी पाहून त्याला देखील संघातून डच्चू दिला जाईल, अशी चिन्हे दिसत आहे. यांसह अनेक अपयशी आणि सुमार कामगिरी करणाऱ्या जुन्या खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
नव्या दमाच्या खेळाडूंसह फ्रँचायजीला बांधायचाय नवीन संघ…
आयपीएलचा हा हंगाम संपल्यानंतर पुढील हंगामात जास्त अंतर असणार नाही. त्यामुळे चेन्नई संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी संघाची नव्याने बांधणी करण्याचे आणि काही कठोर निर्णय व्यवस्थापन संघाकडून घेतले जातील, असे स्पष्ट केले आहे.
आयपीएलमध्ये अधिक वयाचे खेळाडू देखील कधी कधी एक हाती सामना जिंकून देतात. खुद्द चेन्नई संघानेच ही बाब अनेकदा सिद्ध केलेली आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाचे व्यवस्थापक मंडळ मोठा निर्णय घेताना, या बाबींचा देखील जरुर विचार करेल. मात्र, या हंगामानंतर किंवा चालू हंगामात देखील चेन्नई संघात नक्कीच मोठे बदल झालेले दिसतील, अशी चिन्हे सध्या दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
-IPL 2020 Playoff: बेंगलोरच्या विजयाने केल्या चेन्नईच्या आशा पल्लवित; आता एका जागेसाठी ५ दावेदार
-सीएसकेला दूसऱ्या ड्वेन ब्रावोचा शोध, ‘ही’ ३ नावं आहेत चर्चेत
-‘एक तर तुम्ही जिंकता किंवा काहीतरी शिकता,’ दिग्गजाने केली धोनीची प्रशंसा
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज
-आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज
-आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज