शुक्रवारी(२ ऑक्टोबर) आयपीएल २०२० मधील १४ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला सनरायझर्स हैदराबादकडून ७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या हंगामातील चेन्नईचा हा सलग तिसरा पराभव आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने चेन्नईला १६५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. चेन्नईला निर्धारित २० षटकात ५ बाद १५७ धावाच करता आल्या.
चेन्नईकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. तर धोनीने नाबाद ४७ धावा केल्या. तसेच फाफ डु प्लेसिसने २२ धावा केल्या. या व्यतिरिक्त चेन्नईकडून कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा हैदराबादच्या गोलंदाजांनी ओलांडू दिला नाही.
या दरम्यान अनेकदा धोनी एकेरी, दुहेरी धाव घेतल्यानंतर दमलेला दिसला. पण असे असतानाही त्याने एकेरी, दुहेरी धावा करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. त्याने फलंदाजी करताना मधेच फिजिओलाही बोलावले. त्यामुळे अनेकांना धोनीला काहीतरी त्रास होत असल्याचे वाटले. पण सामन्यानंतर धोनीनेच खुलासा केला की दुबईत उष्णता असल्याने समस्या होत आहेत.
सामन्यानंतर धोनी म्हणाला, ‘मी अनेक चेंडूवर चांगले फटके मारु शकलो नाही. मी खूप प्रयत्न करत होतो. मला कोणताही त्रास नाही पण सध्याच्या उष्णतेत सातत्याने गळ्याला कोरड पडते.’
तसेच धोनीने हैदराबादविरुद्धचा सामना गमावण्यामागे चेन्नईचे खराब क्षेत्ररक्षण कारणीभूत असल्याचे तसेच खेळाडू सातत्याने एकच चुका करत असल्याचे सामन्यानंतर मान्य केले.