टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 फेरीत भारतानं बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं 196/5 अशी मोठी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात, बांगलादेशचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 146 धावाच करू शकला.
टीम इंडियाचा या विश्वचषकातील हा पाचवा विजय आहे. या विजयासह भारतानं उपांत्य फेरीच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलं. बांगलादेशविरुद्ध शानदार विजयात भारताच्या पाच खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला भारताच्या विजयाच्या 5 नायकांबद्दल सांगणार आहोत.
हार्दिक पांड्या
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात हार्दिक पांड्यानं आपली अष्टपैलू कामगिरी दाखवली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यावर त्यानं तुफानी अर्धशतक झळकावलं. हार्दिकनं 27 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं नाबाद 50 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे भारतानं मोठी धावसंख्या उभारली. त्याचवेळी गोलंदाजीत हार्दिकनं 3 षटकांत 32 धावा देत एक विकेट घेतली. त्याच्या या कामगिरीसाठी हार्दिकला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
विराट कोहली
या विश्वचषकात अनुभवी फलंदाज विराट कोहली पहिल्यांदाच फार्मात दिसला. त्यानं 28 चेंडूत 37 धावांची खेळी केली. कोहलीनं तीन षटकार आणि एक चौकार लगावला. कोहलीनं आधी कर्णधार रोहित शर्मासोबत (23) पहिल्या विकेटसाठी 39 धावांची आणि नतर रिषभ पंतसोबत दुसऱ्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी केली. याआधी टूर्नामेंटमध्ये कोहलीनं चार डावात फक्त 29 धावा केल्या होत्या.
रिषभ पंत
यष्टिरक्षक रिषभ पंतनं या सामन्यात शानदार फलंदाजी केली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या पंतनं 24 चेंडूत 36 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून चार चौकार आणि दोन षटकार आले. पंतनं कोहलीसह शिवम दुबेसोबत चांगली भागीदारी केली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 31 धावा जोडल्या. कोहली आणि सूर्यकुमार यादव (6) एकाच षटकात बाद झाल्यानंतर पंतनं भारताचा डाव सांभाळला.
कुलदीप यादव
फिरकीपटू कुलदीप यादवनं या सामन्यात पुन्हा एकदा प्रभावी गोलंदाजी केली. अफगाणिस्तानविरुद्ध दोन बळी घेणाऱ्या कुलदीपनं बांगलादेशविरुद्ध 3 बळी घेतले. त्यानं चार षटकांत केवळ 19 धावा दिल्या. कुलदीपनं सलामीवीर तनजीद हसन (29), तौहीद हृदयॉय (4) आणि शकीब अल हसन (11) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
जसप्रीत बुमराह
या विश्वचषकात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. बांगलादेशविरुद्ध त्यानं किफायतशीर गोलंदाजी करत दोन बळी घेतले. बुमराहनं चार षटकात केवळ 13 धावा दिल्या. त्यानं बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो (40) आणि रिशाद हुसेन (24) यांचे बळी घेतले. बुमराहनं आतापर्यंत 5 सामन्यांत एकूण 10 विकेट घेतल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अर्शदीप सिंग (12) नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक-कुलदीपच्या झंझावातात बांगलादेश उडाला! टीम इंडियाचं सेमीफायनलमधील स्थान जवळपास पक्कं
पॅट कमिन्सची सलग दुसरी हॅट्ट्रिक! टी20 विश्वचषकात घडला नवा इतिहास
नाद करा पण कोहलीचा कुठं! अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज