क्रिकेटचा खेळ अत्यंत सुरेख आहे. ज्यामुळे दोन अनोळखी लोक मित्र बनतात. वारंवार, ही गोष्ट आपण पाहत असतो. ड्रेसिंग रूम सामायिक करणे, परदेश दौर्यावर जाणे, एकत्रितपणे मैदानावर व मैदानाबाहेर वेळ घालविल्यामुळे खेळाडूंमध्ये मैत्रीचे एक खोल नाते निर्माण होते. पण, कधीकधी काहीतरी विचित्र घडते. म्हणजेच खूप चांगले मित्र म्हणून ओळखले जाणारे खेळाडू अचानक शत्रू बनतात.
असे बरेच भारतीय खेळाडू आहेत जे, आधी उत्तम मित्र होते पण नंतर त्यांची मैत्री संपुष्टात आली आणि जणू काही ते एकमेकांचे शत्रू बनले आहेत. अशाच, काही खेळाडूंविषयी आपण जाणून घेऊया.
१. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपल्या फलंदाजीमुळे जवळपास प्रत्येकाचे मन मोहित केले. याशिवाय, विनोद कांबळीसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांसाठी तो प्रसिद्ध होता. सचिन व विनोद कांबळी लहानपणापासूनचे मित्र होते. त्यांचे प्रतिबिंब फलंदाजीत स्पष्ट दिसत.
शालेय दिवसांमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी परस्परमैत्री आणि समजूतदारपणामुळे ६६४ धावांच्या भागीदारीची नोंद केली होती. यानंतर सचिनने प्रथम आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली, त्यानंतर थोड्याच वेळानंतर कांबळीला टीम इंडियामध्ये स्थान मिळालं.
हळूहळू, अनेक कारणांमुळे सचिन आणि कांबळीच्या मैत्रीत दुरावा निर्माण होऊ लागला. यानंतर, दोघे सुमारे ८-१० वर्षे एकमेकांशी बोलत नव्हते. एका कार्यक्रमादरम्यान कांबळीने सचिनच्या विरोधात म्हटलं होतं की, सचिन जेव्हा शक्य असेल तेव्हा वाईट काळात त्याला मदत करत नव्हता. आता मात्र, या दोघांमधील वाद मिटला आहे.
२. दिनेश कार्तिक आणि मुरली विजय
दिनेश कार्तिक व मुरली विजय (Murali Vijay) हे एकेकाळी टीम इंडियाचे प्रमुख सदस्य होते. कार्तिक आणि मुरली यांच्या मैत्रीविषयी सर्वांना माहित होते. दोघेही खूप जवळचे मित्र होते पण नंतर त्यांची मैत्री तुटली.
कार्तिकने आपली पत्नी निकीताची ओळख विजयसोबत करुन दिली. याच दरम्यान, निकीता व विजय यांचे प्रेमसंबंध फुलले. ही गोष्ट कार्तिकला समजली. त्यानंतर काही दिवसांतच कार्तिक आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाला आणि नंतर कार्तिकची पत्नी निकिताने मुरली विजयशी लग्न केले.
याचसोबत, कार्तिक आणि मुरली विजय यांची मैत्रीही तिथेच संपली. हे दोन्ही खेळाडू समोरासमोर आले तरी एकमेकांचा चेहराही पाहत नाहीत. दोघेही तमिळनाडू संघासाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळतात.
३. विराट कोहली आणि गौतम गंभीर
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील तणावही कोणापासून लपलेला नाही. दोन्ही खेळाडू दिल्लीचे असून त्यांनी अनेक सामने एकत्र खेळले आहेत.
विराट कोहली आणि गौतम गंभीर दिल्लीसाठी एकत्र खेळत आणि मित्रही होते. खरतर, ते दोघे फार चांगले मित्र नव्हते पण तरीही दोघांचे संबंध वाईट नव्हते.
यानंतर आयपीएल दरम्यान विराट आणि गंभीर यांच्यात भर मैदानात भांडण झाले. २०१३ मध्ये केकेआर-आरसीबी सामन्यादरम्यान विराट कोहली बाद होऊन बाहेर जाताना शिवीगाळ करीत होता, तेव्हा गंभीर म्हणाला की, “तु बाद झालाय मग शिवी का देत आहेस.” यानंतर कोहलीची आणखी चिडचिड झाली आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर विराट-गंभीरचे संबंध बिघडू लागले.
४. एमएस धोनी आणि वीरेंद्र सेहवाग
भारताचा माजी दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि माजी कर्णधार एमएस धोनी यांच्यात सुरुवातीच्या काळात चांगली मैत्री होती. मस्त मौला स्टाईलमध्ये खेळणारे सेहवाग-माही यांचे संबंध अत्यंत मैत्रीपूर्ण होते. पण, कालांतराने दोघांत कलह निर्माण झाला.
कर्णधार झाल्यानंतर धोनी आणि सेहवाग यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला. एकावेळी धोनीने सेहवागला वगळल्याचा मुद्दा चांगलाच चर्चिला गेला होता. खराब क्षेत्ररक्षणाचा हवाला देत धोनीने सेहवागला संघाबाहेर काढले असे म्हटले जाते.
या गोष्टींवर धोनी व सेहवाग कधीही जाहीररीत्या बोलले नाहीत. पण, अधूनमधून सेहवागच्या वक्तव्यांमुळे दोघांमध्ये सगळे काही आलबेल नाही असे दिसून येते.
५. युवराज सिंग आणि एमएस धोनी
भारतीय क्रिकेट संघाचे दोन दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग आणि एमएस धोनी यांच्या मैत्रीचे किस्से क्रिकेटजगतात खूप प्रसिद्ध आहेत. दोघे खरोखरच जय आणि वीरूसारखे राहत होते. २०११ चा विश्वचषक जिंकल्यानंतर सोशल मीडियावर एक चित्र व्हायरल झाले होते, ज्यामध्ये माही युवीच्या अंगावर बसला होता. हे फक्त जिगरी मित्रांमध्येच घडते.
पण आज अशी वेळ आली आहे की, दोघे एकमेकांच्या समोरासमोर उभे राहत नाहीत आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देत नाहीत. २०११ विश्वचषकानंतर युवराज कर्करोगाशी लढल्यावर टीम इंडियामध्ये परतला. पण, त्यानंतर धोनीला जास्त संधी मिळाली नाही.
खरं तर, जेव्हा २०१५ मध्ये युवीला संघातून वगळण्यात आलं होतं, तेव्हा तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यानंतर पंजाबकडून खेळताना धावा देखील केल्या. पण, तरीही धोनीने त्याचा विचार न करता, विश्वचषक २०१५ मध्ये स्टुअर्ट बिन्नीला स्थान दिले. यानंतर दोघांमध्ये भांडणाची बातमी येऊ लागली. निवृत्तीनंतर युवीने उघडपणे म्हटले आहे की, धोनीने त्याला पाठिंबा दिला नाही.
ट्रेंडिंग लेख –
-भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर
-क्रिकेटवर बनलेल्या या २ जबरदस्त बॉलिवूड चित्रपटांना दुर्लक्ष करुन चालणार नाही
-आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी
महत्त्वाच्या बातम्या –
-आयपीएलमध्ये मिळाली नाही संधी आता निवृत्तीनंतर एलपीएल मध्ये खेळणार ‘हा’ भारतीय खेळाडू






