भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. तीन सामन्यांची ही मालिका पर्थ, अॅडलेड आणि सिडनी येथे खेळली जाणार आहे. नेहमीप्रमाणे यंदाही ही सामने रोमांचक ठरणार आहेत. विशेष म्हणजे, 2020 साली जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता, तेव्हा संघात असलेले पाच खेळाडू यंदाही स्क्वाडचा भाग आहेत. हे खेळाडू तेव्हाही भारतीय संघासाठी महत्त्वाचे होते आणि यावेळीही आपल्या अनुभवाच्या जोरावर मालिकेत निर्णायक भूमिका बजावू शकतात.
2020 मध्ये जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हा विराट कोहली संघाचे कर्णधार होते. त्या मालिकेत त्याने 173 धावा केल्या होत्या आणि त्याचा सर्वोत्तम स्कोअर 89 धावांचा होता. आता विराट वनडे फॉर्मॅटवर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे त्याचा फॉर्म आणि फिटनेस टीमसाठी मोठी ताकद ठरू शकते. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान पिचवरचा त्याचा अनुभव भारतासाठी गेम चेंजर ठरू शकतो.
पाच वर्षांपूर्वी गिलला वनडे संघातील नवा चेहरा मानले जात होते. त्याला केवळ एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती, ज्यात त्याने 33 धावा केल्या होत्या. आता तोच शुबमन गिल भारतीय संघाचा वनडे कर्णधार आहे आणि उत्कृष्ट फॉर्ममध्येही आहे. गिलची नेतृत्वक्षमता आणि फलंदाजी, दोन्हीही भारतासाठी या मालिकेतील यशाची गुरुकिल्ली ठरू शकतात.
2020 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अय्यरचे प्रदर्शन काही खास राहिले नव्हते. तीन सामन्यांत त्याने फक्त 59 धावा केल्या होत्या. मात्र आता तो अधिक परिपक्व आणि अनुभवी खेळाडू बनले आहेत. अलीकडील सामन्यांमध्ये त्याने मधल्या फळीत चांगली स्थिरता दाखवली आहे आणि यावेळी त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.
केएल राहुलने मागील मालिकेत यष्टिरक्षणासोबतच फलंदाजीही केली होती. एका सामन्यात त्याने 76 धावांची शानदार खेळी साकारली होती. राहुल आता संघात एक स्थिर यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे आणि यंदाही तो भारताच्या मधल्या फळीतली कणा ठरेल.
2020 मध्ये कुलदीप यादव कठीण फॉर्ममधून जात होता आणि त्याला केवळ एका सामन्यात संधी मिळाली होती, ज्यात त्याने एकच विकेट घेतली होती. पण गेल्या काही वर्षांत त्याने आपल्या खेळात जबरदस्त सुधारणा केली आहे. आता कुलदीप भारताच्या प्रमुख फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरू शकतो.





